“सर्वसामान्य नागरिकांसाठीच्या सेवांचे वेळेत वितरण करा… महसूल, कामगार, पोलीस विभागाचे चांगले काम…” – राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग…

Spread the love

रत्नागिरी/04 मार्च- सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी अधिकारी आहेत. सामान्य नागरिक यांच्या निगडीत असणाऱ्या सर्व सेवांचे वेळेत वितरण झाले पाहिजे. ज्या विभागांची कामगिरी अद्याप मागे आहे, त्यांनी त्यात सुधारणा करावी, अशी सूचना कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त बलदेव सिंग यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या अंमलबजावणीबाबत कोकण विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त श्री. सिंग यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सहसचिव माणिक दिवे, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी राज्य सेवा हक्क आयुक्त श्री. सिंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनी संगणकीय सादरीकरण करुन जिल्हा परिषदेबाबत सविस्तर माहिती दिली.

राज्य सेवा हक्क आयुक्त श्री. सिंग म्हणाले, ज्या ज्या विभागांची प्रलंबितता दिसत आहे, त्यांनी त्याबाबतची कारणे जाणून त्याचे वितरण करावे. सेवा वितरणचे प्रमाण सुधारले पाहिजे. महसूल, कामगार, पोलीस विभागाचे कामकाज चांगले आहे. कृषी, शिक्षण, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास, नगरविकास हे विभाग सर्वसामान्य नागरिकांच्या संबंधित आहेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे वितरण वेळच्या वेळी व्हायला हवे. त्यासाठी ज्या ठिकाणी पाठीमागे आहोत, त्यामध्ये सुधारणा करा. आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी निष्क्रीय आहेत, त्याबाबतची कारणे तपासून, ती सुरु करा. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांबाबत काळजीपूर्वक दक्ष राहून त्या वेळेत पुरवाव्यात. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबत जनजागृती, प्रचार प्रसिध्दी करावी.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, महसूल सेवा वितरण प्रमाण 95 टक्के आहे. वेळेत सेवा वितरण केल्या जातील, त्याबाबत निश्चितपणे काळजी घेऊ. येत्या काही दिवसात सर्व सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्याच्या कामगिरीमध्ये निश्चितच अधिक वाढ होईल, असेही ते म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page