*रत्नागिरीत मराठी भाषा संग्रहालय उभारले जाणार,साने गुरुजींच्या पालगडमध्ये पुस्तकांचे गाव; पुस्तक महोत्सवदेखील रत्नागिरीत मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा साहित्यिकांसोबतच्या संवाद बैठकीत निर्णय*

Spread the love

*रत्नागिरी-* 25 कोटी रुपये खर्चून 1 एकर जागेत मराठी भाषा संग्रहालय उभे करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे मराठी भाषा विभाग आढावा आणि साहित्यिकांसोबत झालेल्या संवाद बैठकीत जाहीर केला. साने गुरुजींच्या पालगडमध्ये पुस्तकांचे गाव आणि पुण्यानंतर रत्नागिरीत पुस्तक महोत्सव सुरु करण्याचा निर्णयही आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मराठी भाषा विभाग आढावा बैठक आणि साहित्यिकांसोबत संवाद आज येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाला.  यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती संघाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मराठी भाषा समिती सदस्य प्रकाश देशपांडे, गजानन पाटील, प्रा. शिवराज गोपाळे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रातांधिकारी जीवन देसाई, विश्वकोष निर्मिती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातून उपस्थित राहिलेल्या विविध साहित्यिकांसोबत मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत यांनी संवाद साधला. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचे डॉ. सामंत यांनी स्वागत केले. 
मराठी भाषा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सुरुवातीला त्यांनी दिली.  त्याचबरोबर घेतलेले प्रमुख निर्णयदेखील डॉ. सामंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, रत्नागिरीत २५ कोटी रुपये खर्चून, 1 एकरमध्ये भाषा संग्रहालय उभारले जाईल. यामध्ये बोलीभाषेवर संशोधन केंद्र, पुस्तक विक्री केंद्र, शब्दकोश निर्मितीचे दालन असेल. साने गुरुजींच्या पालगडमध्ये  ‘पुस्तकांचे गाव’ हा उपक्रम सुरू केला जाईल. पुण्यानंतरचा दुसरा सर्वात मोठा ‘पुस्तक महोत्सव’ रत्नागिरीत आयोजित करणार. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘मराठी भाषा विभाग’ हे स्वतंत्र कार्यालय स्थापन करुन, मराठी भाषा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. 100 कोटी रुपये खर्चून नरिमन पॉईंटला मराठी भाषा भवन तर ऐरोली येथे 40 कोटी रुपये खर्चून संशोधन केंद्र बांधण्यात येणार आहे. महिला साहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलनास प्रत्येकी 5 कोटी रुपये निधी दिला जाईल. 

*आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील मराठी भाषा विभागाचे कार्य*

बेळगाव सीमा भागातील 200 ग्रंथालयांना 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तंजावर येथील सरस्वती ग्रंथालयाला 35 वर्षानंतर मदत करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. मराठी भाषा विभागाला तेथील शासन जागा द्यायला तयार झाले आहे. दिल्ली येथील जेएनयूएम मध्ये कवी कुसुमाग्रजांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु करायला 10 कोटी दिले.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर तेथे एम. ए चा अभ्यासक्रम सुरु केला आहे. विद्यापीठाने दिलेल्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात येणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी मराठी भाषा  विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे. लंडनमध्ये ज्या इमारतीत महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली होती, ती वास्तू शासनाने लिलावातून विकत घेतली. तेथे आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू होणार आहे. दुबई एक्स्पो आणि जपानमध्ये मराठी संस्कृतीचे सादरीकरण. जपानी माणसाने  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि गणपतीची आरती म्हटली, ही मराठीची ताकद आहे.  पुढील वर्षीचे ‘विश्व मराठी संमेलन’ परदेशात घेणार.
धावत्या रेल्वेमध्ये जगातील पहिले ‘ग्रामीण साहित्य संमेलन’ आयोजित केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page