
मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे यांना आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी आमंत्रित केले होते, अशी माहिती मिळत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील सोबत होते. तर मनसेकडून अमित ठाकरे, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर, मनसे नेते अभिजित पानसे उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीमागे शासकीय कामकाजांचं कारण सांगत असले तरी त्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसावी हे शक्यच नाही. एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊनच उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले असावेत, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा टायमिंग देखील महत्त्वाचा आहे. महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना डावललं जात असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणाऱ्या अर्थखात्याची तक्रार केल्याची देखील माहिती समोर येत होती. या सगळ्या घडामोडींदरम्यान आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट घडत आहे.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक तर सर्वात जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीत महायुतीत भाजपकडून जागावाटपात मित्रपक्षांना अपेक्षित जागा दिल्या जाऊ शकतात का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण शिवसेनेची अनेक वर्षांपासून मुंबईत सत्ता राहिलेली आहे. पण आता शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेनेची मुंबईत ताकद आहे. कारण विधानसभा निवडणुकीत ते बघायला मिळालं. त्यामुळे त्या ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे राज ठाकरे आपल्यासोबत असतील तर त्याचा आपल्याला फायदा होईल, अशी रणनीती एकनाथ शिंदे यांची असू शकते. राज ठाकरे हे रोखठोक मतं मांडणारे नेते आहेत. ते त्यांच्या आक्रमक भाषणातून लाखो नागरिकांची मतं वळवू शकतात. याशिवाय राज ठाकरे सोबत असले तर भाजपवरही दबाव मिळवता येईल, अशी रणनीती एकनाथ शिंदे यांची असू शकते