पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी…

Spread the love

मुसळधार पावसाचा फटका आता प्रसिद्ध देवस्थानांदेखील बसत आहे. रायगडमध्ये जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पालीतील ऐतिहासिक अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पाणीच पाणी बघायला मिळत आहे.

रायगड : मुसळधार पावसामुळे पाली येथील अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वर मंदिरात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. मंदिरासमोरील पूर्व भागात असलेल्या ओढ्याला (ओव्हळ) पूर आल्याने हे पाणी ओसंडून थेट मंदिरात आणि आजूबाजूच्या परिसरात शिरले. या घटनेमुळे मंदिराचा सभामंडप जलमय झाला असून भाविक आणि कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

काही दिवसांपूर्वी पाली नगरपंचायत प्रशासनाकडून या ओढ्याची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने हा ओढा अधिक खोल केला असता तर पाण्याचा निचरा वेगाने झाला असता आणि मंदिरात पाणी शिरण्याची ही परिस्थिती कमी प्रमाणात ओढवली असती, असे बोलले जात आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया काय?..

दरम्यान, या घटनेनंतर बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी सांगितले की, पूर ओसरताच मंदिर प्रशासनाकडून मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या भागाची स्वच्छता लागलीच करण्यात येईल.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पेणमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद…

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत सरासरी ७६.२१ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पेण तालुक्यात सर्वाधिक १२५ मिमी पाऊस झाला असून सुधागडमध्ये ११० मिमी, श्रीवर्धनमध्ये १०६ मिमी, खालापूरमध्ये १०० मिमी आणि माणगावमध्ये ८८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

अंबा नदी धोक्याच्या पातळीवर…

सततच्या पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी गाठली असून कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. हेटवणे मध्यम प्रकल्पात ३८.८२ टक्के जलसाठा झाला असून जिल्ह्यातील २८ लघुप्रकल्पांपैकी ११ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

११ गावातील नागरिकांना सुरक्षितस्थली हलवले..

पूराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आतापर्यंत ११ गावांतील १६० कुटुंबांमधील ५६९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची पथके सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पावसाने १८९ घरांचे झाले नुकसान…

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत १८९ घरांचे नुकसान झाले असून चार गोठे बाधित झाले आहेत. रोहा तालुक्यातील बालसई येथील एका मंदिराचे नुकसान झाले असून महाड तालुक्यातील विहेरे सुतारकोंडे येथील शाळेलाही फटका बसला आहे. याशिवाय दोन जणांचा मृत्यू, एका व्यक्तीला गंभीर दुखापत आणि एक व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. तसेच एका बैलासह दोन गायींचा मृत्यू झाल्याने पशुधनाचेही नुकसान झाले आहे.

वाहतुकीवरही परिणाम..

वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. नागोठणे–रोहा मार्गावरील भिसे खिंडीत झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, यंत्रणांनी तत्काळ रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. पाली–वाकण मार्ग अद्याप बंद असून मुंबई–गोवा महामार्गावरील सुकेळी परिसरातील वाहतूक पूर्ववत सुरू आहे. रेल्वे सेवाही सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाचं मोलाचं आवाहन…

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून अंतिम आकडेवारी पुढील अहवालात स्पष्ट होणार आहे. हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page