1947 साली योजना असती तर मी दोन वेळचे जेवले असते:आशा भोसले यांनी दिली लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया…

Spread the love

*मुंबई-* महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत असल्याचे दिसत आहे. यावर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 1947 साली जर ही योजना अली असती तर मी दोन वेळचे जेवले असते, असे म्हणत त्यांनी या योजनेचे कौतुक केले आहे. शनिवारी झालेल्या अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

आशा भोसले म्हणाल्या, लाडक्या बहिणींना तुम्ही जे पंधराशे रुपये देत आहात, त्याची व्यथा आणि आनंद माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार नाही. हे काम जर 1947 साली कोणी केले असते, पंधराशे रुपये मिळाले असते, तर मी दोन वेळ जेवले असते. सकाळचे जेवण संध्याकाळपर्यंत जपून ठेवायची गरज पडली नसती. पुढे त्या म्हणाल्या, मी जेवण सांभाळून ठेवायला शिकले होते, कारण मी दुपारी जेवू शकत नव्हते. जेव्हा पती घरी यायचे तेव्हा आम्ही दोघे मिळून जेवायचो, तेवढेच जेवण माझ्याकडे असायचे. ज्या महिलांकडे पैसे नसतात त्यांच्यासाठी पंधराशे रुपये फार मोठी रक्कम आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधी जमा झाला होता. आता भाऊबीजेला तीन हजार रुपये जमा करणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे आता दिवाळी देखील लाडक्या बहिणींना गोड जाणार आहे. या योजनेवर मात्र महाविकास आघाडीकडून टीका आणि विरोध होताना दिसत आहे.

लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडी सरकार सातत्याने टीका करत आले आहे. पंधराशे रुपयात महिलांचे मत विकत घेण्याचे काम सुरू असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्यात निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषेला देखील अभिजात दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे महायुती तसेच केंद्रातील सरकार केवळ राजकारणासाठी या गोष्टी करत असल्याची टीका विरोधकांकडून होताना दिसत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page