
*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावरील खाजगी मालकीचा दीर्घकालीन वाद अखेर मिटण्याच्या मार्गावर असून, किल्ल्याच्या भूसंपादन प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर दिमाखात उभा असलेला गोपाळगड हा कोकणातील महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा मानला जातो. मात्र, किल्ल्याचा काही भाग खाजगी मालकीच्या हद्दीत असल्याने पर्यटकांना प्रवेशावेळी अडथळे, वाद आणि विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या प्रकारामुळे सामाजिक माध्यमांवरही अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या गोपाळगडावर नागरिकांना विनामूल्य आणि निर्बंधविरहित प्रवेशाचा अधिकार आहे. तरीही खाजगी मालकीच्या वादामुळे किल्ल्याच्या संवर्धनासह विकासकामांवर परिणाम होत होता.
अखेर प्रशासनाने कायदेशीर भूसंपादनाचा मार्ग स्वीकारत हा वाद कायमस्वरूपी निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण किल्ला शासनाच्या मालकीचा होणार असून, त्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून ढासळलेली तटबंदी, मुख्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंती यांची दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच माहिती फलक, सुरक्षित पायवाटा, स्वच्छता सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सोयी-सुविधा उभारण्याचे नियोजन असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शिवतेज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संकेत साळवी यांनी भूसंपादनाच्या निर्णयाचे स्वागत करत जमीनमालकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोबदल्याची रक्कम पारदर्शकपणे जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच गोपाळगड शासनाच्या ताब्यात आल्यानंतर किल्ल्याला त्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी संवर्धनाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असेही त्यांनी नमूद केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*