
शिधापत्रिकाधारकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण वेळेवर होत नसून व्यवहारांमध्ये मोठा खोळंबा…
*रत्नागिरी :* सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्य वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘ई-पॉस’ प्रणालीतील सातत्यपूर्ण तांत्रिक बिघाड व मंद इंटरनेट सर्व्हरच्या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकांनी सोमवारी (७ सप्टेंबर) एकदिवसीय शांततापूर्ण संप पुकारला. ‘ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन’च्या हाकेला प्रतिसाद देत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी आपले व्यवहार बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधून घेतले.
मागील काही दिवसांपासून एनआयसीकडून मिळणाऱ्या इंटरनेट सर्व्हरमध्ये वारंवार गंभीर बिघाड होत असून, सर्व्हर अतिशय संथ चालणे किंवा अचानक बंद पडणे, अशा समस्या उद्भवत आहेत. यामुळे शिधापत्रिकाधारकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण वेळेवर होत नसून व्यवहारांमध्ये मोठा खोळंबा निर्माण होत आहे. या तांत्रिक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांना तासनतास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे, तर दुकानांवर वाद निर्माण होऊन दुकानदारांची नाहक प्रतिमा मलिन होत आहे. तसेच दुकानदारांचा मनुष्यबळ, वीज व इंटरनेटचा अतिरिक्त खर्च वाढून आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबतचे निवेदन शासनाकडे तसेच जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वीही देण्यात आले आहे. शासनाने या रास्त मागण्यांची दखल घेऊन एनआयसी सर्व्हरची समस्या त्वरित न सोडवल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
*रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या…*
– इ – पॉस प्रणालीतील सर्व्हर बिघाडावर तात्काळ कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सक्षम तांत्रिक पथक नियुक्त करावे.
– सर्व्हर क्षमतेत वाढ करून खंडित न होणारी अखंडित सेवा उपलब्ध करून द्यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास त्वरित अधिकृत सूचना प्रसिद्ध करून स्वतंत्र मदत कक्ष सुरू करावा.
– सर्व्हर बंद असलेल्या कालावधीत शिधापत्रिकाधारकांसाठी ऑफलाइन अन्नधान्य वितरणाची सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी. तांत्रिक त्रुटींमुळे व्यवहार कमी झाल्यास दुकानदारांवर कारवाई किंवा दंड न आकारता नुकसानभरपाई द्यावी.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*