
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही वैध शासकीय परवानगीशिवाय राजरोसपणे डोंगरात शक्तिशाली भूसुरुंग लावून बेकायदेशीर उत्खनन केले जात असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. या सुरुंगांच्या तीव्र हादऱ्यांमुळे या भागातील घरांना तडे गेल्याचेही पुढे आले आहे. या उत्खननाबाबत पांगरी ग्रामपंचायतीने केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या जीवितास धाेका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पांगरी ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन २५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना भेटून या ठिकाणी सुरू असलेल्या उत्खननाबाबत तक्रार दिली होती. ग्रामसभेत या बेकायदेशीर उत्खननाविरोधात रीतसर ठरावही मंजूर करण्यात आला होता. प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, या बेकायदेशीर सुरुंगांमुळे ग्रामस्थांच्या जीवितास व मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला आहे, घरे खचत आहेत, पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत आणि धुळीचे प्रदूषण वाढले आहे. परंतु, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे हा खाणमाफिया अजूनही बिनदिक्कतपणे सुरुंगांचे स्फोट घडवून आणत आहे, असा आरोप ग्रामस्थानी केला आहे.
तसेच १२ जून २०२६ रोजी पांगरी तलाठी कार्यालयाने दरड कोसळण्याची शक्यता वर्तवत वाडीतील ७ मुख्य कुटुंबप्रमुखांना लेखी नोटीस बजावली. या नोटीसमध्ये प्रशासनाने म्हटले आहे की, ‘तुमची घरे अगदी दरड प्रवण क्षेत्रात आहेत आणि भविष्यात पाऊस पडल्यास दरड कोसळू शकते. म्हणून तुम्ही तत्काळ घर खाली करून सुरक्षितस्थळी जावे. तसे न केल्यास होणाऱ्या नुकसानास तुम्ही स्वतः जबाबदार राहाल आणि शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही.
गावातील निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या आणि लोकांची घरे धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करून त्याचे काम तत्काळ बंद करणे गरजेचे होते. परंतु, मूळ कारणावर कारवाई करण्याचे सोडून ग्रामस्थांना नाेटीस बजावण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
*पिढ्यानपिढ्यांची घरे साेडून कुठे जायचे?..*
आम्ही आमची पिढ्यानपिढ्यांची घरे सोडून कुठे जायचे? आणि बेकायदेशीर काम करणाऱ्याला अभय का दिले जात आहे, असा प्रश्न पांगरीतील ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
*ज्यांच्या घरांना तडे त्यांनाच नाेटीस..*
ज्यांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत, त्यांनाच प्रशासनाने दरडक्षेत्र असल्याचे सांगत घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. या ग्रामस्थांना ‘स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित स्थळी जा, अन्यथा जीवितहानीस तुम्हीच जबाबदार राहाल’ असे आदेश प्रशासनाने काढले आहेत.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*