कोयनेच्या पात्रातून पुन्हा जागृत झाला इतिहास,पाण्याखालील भग्न मंदिरे आणि विस्थापनाच्या वेदना उघड्यावर…

Spread the love

रत्नागिरी:- कोयना कोरडी झाली आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुन्या गावाचा इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि विस्थापनाच्या वेदना आजही भग्न अवशेषांमधून बोलताना दिसत आहेत. कोयनेच्या खोऱ्यातील जुन्या आठवणींचा अभ्यास करण्यासाठी चिपळूणचे अभ्यासक समीर कोवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोयनेची वारी केली. त्यानंतर त्यांनी कोयना खोऱ्यातील जुन्या गावाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या केल्या.

कोयना धरणाच्या उभारणीला १९५२ मध्ये सुरुवात झाली. या धरणाने या भागातील अनेक गावे, जमीन, मंदिरे, समाधिस्थळे आणि अनेकांच्या आठवणी पाण्याखाली नेल्या; मात्र या गावातील ग्रामस्थांची जिद्द संपवू शकली नाही. आज कोयनेचे पाणी ओसरल्याने पुन्हा एकदा या भागातील गावांचे जुन्या काळातील भग्न वैभव उघड्यावर आले आहे.

जलदूत शहानवाज शहा यांनी माहिती देताना कोयनेच्या भागातील जुन्या घरांचा पाया, दगडी बांधकामांचे अवशेष, समाधिस्थळे, भग्न भिंती, मंदिरांचे खांब, नंदीची भग्न मूर्ती आणि पाण्याखाली लपलेला इतिहास पुन्हा उभा केला. गावकऱ्यांच्या आठवणींत आजही जिवंत असलेले बाजी कुसुंबेश्वर मंदिर, सोमजाई मंदिर, वेताळ मंदिर यांसारखी अनेक प्राचीन मंदिरे नदीपात्रात पाहायला मिळत आहेत.

ही मंदिरे पूर्ण स्वरूपात अस्तित्वात नसली तरी त्यांचे भग्नावशेष आणि दगडी खांब पाहताना तत्कालीन स्थापत्यकलेचे वैभव जाणवते. नदीपात्रात विखुरलेले दगडी अवशेष आणि भग्न नंदी मूर्ती या एकेकाळी समृद्ध असलेल्या धार्मिक व सांस्कृतिक वारशांची साक्ष देत असल्याचे श्री शहा यांनी सांगितले.

त्यानंतर गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांच्या मते बाजी कुसुंबेश्वर मंदिर हे पांडवकालीन असून, या मंदिराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी या मंदिर परिसरात १०५ गावांचा न्यायनिवाडा होत असल्याची दंतकथा आजही सांगितली जाते.

योग्य मोबदला नाहीच…

कोयना धरण उभारण्यात आले, तेव्हा रुळे गावातील सुमारे दीडशेहून अधिक घरे पाण्याखाली गेल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. गावातील शेती, घरे, देवस्थाने, समाधिस्थळे आणि उपजीविकेची साधने धरणाच्या पाण्यात कायमची बुडाली. त्यानंतर गावकऱ्यांनी वरच्या बाजूस नवीन वस्ती करून पुन्हा संसार उभारला; मात्र गावाचे पुनर्वसन अपेक्षित पद्धतीने झाले नाही आणि अनेकांना योग्य मोबदला मिळाला नसल्याची खंत आजही व्यक्त केली जाते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page