दत्त जयंती विशेष:औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापुरात श्री दत्तांचे क्षेत्र; श्री दत्त भगवतांची शिकवण अन् त्रिदेवता रुपामागचे रहस्य काय? वाचा सर्वकाही…

Spread the love

*छत्रपती संभाजीनगर-* मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोषकाळी झालेला भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव संपूर्ण वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा आणि शांतता घेऊन येतो. त्रिदेवतांचे एकत्रित स्वरूप असलेल्या दत्तात्रेयांच्या भक्तिसाधनेतून जीवनातील अनेक रहस्यांवर प्रकाश टाकला जातो.

दत्त जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे सचिव तथा गुरुपुत्र चंद्रकांत मोरे दादा आणि श्रीक्षेत्र दत्तधाम (कारेगाव, परभणी) येथील मठाधिपती सद्‌गुरू मकरंद महाराज यांनी दत्तांच्या अवतार रहस्यापासून ते त्यांच्या शिकवणीपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी स्पष्ट केल्या. दत्तात्रेयांनी जीवनात मधमाशीप्रमाणे प्रयत्नवादी राहण्याची, आनंदी जीवन जगण्याची आणि राष्ट्रीय एकात्मता जपण्याची शिकवण दिली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मूलमंत्राचे महत्त्व आणि औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या दत्तक्षेत्रांचे स्वतंत्र महत्त्व त्यांनी विशद केले. तसेच शाकाहार, निर्व्यसनी राहणे आणि ध्यान-योगातून मनःशांती मिळवण्याचा संदेश दिला.

*त्रिदेवता रुपामागचे रहस्य काय?…*

चंद्रकांत मोरे दादा म्हणतात, सर्वात महान पतिव्रतांपैकी एक म्हणून अनसूया यांची ओळख आहे. या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश साधुरूपात तिच्या आश्रमात आले. ‘निर्वस्त्र भोजन वाढले तरच आम्ही अन्न स्वीकारू,’ अशी अट घातली. क्षणिक संभ्रमानंतर अनसूयेने साधू बालरूपात प्रकट होवोत, अशी प्रार्थना केली. तिच्या तेजाने तिन्ही देव बाळांमध्ये रूपांतरित झाले आणि ममतेने स्तनपान घातले. नंतर देवांनी मूळ रूप धारण केले. तेव्हा अनसूयेच्या विनंतीने तिघांचा संयुक्त अंश म्हणून त्यांच्या पोटी भगवान दत्तात्रेय यांचे प्रगटीकरण झाले.

*मानवी देहाच्च्या संस्कारासाठी दत्तगुरूचे महत्त्व….*

मोरे दादा म्हणतात : दत्तांनी आपल्या जीवनात मनुष्य, प्रकृतीतील अनेक तत्त्वांना गुरू मानले. प्रत्येकाकडून चांगल्या गोष्टी, विचार घेतला. अजगर एकदा खाल्ल्यानंतर सुस्त होतो, त्याप्रमाणे मनुष्याने जीवनात आसक्ती ठेवू नये. मधमाशी ही अर्क जमा करत पोळ्यात ठेवते, ते मनुष्य चोरून घेतो. मात्र ती खचून जात नाही, प्रयत्नवादी राहते. निराश होत नाही. कुमारिकेच्या देहाचे सौंदर्य मर्यादेत असते. त्यामुळे अहंकार बाळगू नये. हेच दत्तात्रेयांनी गुरूकडून शिकले व समाजाला उपदेश दिला.

*शाकाहारी, निर्व्यसनी जीवन अन् ध्यानयोगातून मन:शांती लाभते…*

धैर्यप्राप्तीसाठी भगवंताची उपासना करावी. त्यासाठी ‘दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभदिगंबरा,’ ‘ॐ अत्रिसुताय विद्महे, अनसूयापुत्राय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात्,’ ‘ओम राम चिरंजीवने नमः’ असा बीजमंत्र दिला आहे. तर, आजच्या काळात मनःशांती नाही, त्यासाठी गुरुचरित्राचे पारायण महत्त्वाचे आहे.

*औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूरचे स्वतंत्र महत्त्व…*

मकरंद महाराज म्हणतात, दत्तात्रेय काशीतून संन्यास घेऊन विविध क्षेत्रांत गेले. त्या वेळी औदुंबरमध्ये त्यांनी मूर्खाला ज्ञानाची प्राप्ती करून दिली. औदुंबर वृक्ष दत्तांच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. नरसोबाची वाडी येथे दत्तांनी १२ वर्षे वास्तव्य केले. येथे मनोहर पादुका असून व्याधिनिवारण, शांती आणि समाधानाचे स्थान मानतात. दत्तांचा नृसिंह सरस्वती अवतार गाणगापूरमध्ये प्रकट होऊन निर्गुण पादुका चैतन्याचे प्रतीक आहे.

*श्री दत्त भगवंतांची शिकवण काय? परोपकारी वृत्ती असावी…*

अति संग्रह करू नये. समानता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता जपावी. औदुंबरासारख्या वृक्षांमध्ये औषधी गुणधर्म आणि आध्यात्मिक शक्ती असते. जीवनात आनंदी, प्रयत्नवादी असावे, अनावश्यक इच्छा बाळगू नये. साधेपणाने जीवन जगावे. परोपकारी वृत्ती असावी, नेहमी सत्य बोलावे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page