राज्यात गारठा वाढला; थंडी पुन्हा परतली; थंडी पुन्हा जोर धरणार….

Spread the love

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. राज्यात आता पुन्हा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यापासून काहीशी दुरावलेली थंडी आता पुन्हा एकदा परतताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 ते 48 तासांमध्ये राज्यातील तापमानात सरासरी 3 ते 4 अंशांची घट अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात होताना दिसणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागांवरही थंडीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

नवीन तयार झालेल्या वेस्टर्नस डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू-काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील हवामानात देखील बदल जाणवू लागले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात थंडी कमी राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्‍चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यांतील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज बुधवारी हवामान विभागाने जाहीर केला.

राज्यात थंडी पुन्हा जोर धरणार असून, वरील भागांमध्ये किमान तापमानाचा आकडा पुन्हा एकदा 10 अंशांहून कमी असल्याचं पाहिलं जाईल. कोकण पट्ट्यामध्ये तापमानात फारशी घट अपेक्षित नसून, उलटपक्षी इथं सूर्य डोक्यावर येत असताना तापमानात काहीशी वाढ झाल्याचं जाणवेल. इथं मुंबई आणि उपनगरांमध्ये सायंकाळी तापमानात घट अपेक्षित असून, दिवसा मात्र उष्मा अडचणी वाढवताना दिसेल. जानेवारी महिन्यात वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली होती. राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक परिस्थिती होती. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page