डॉ. तानाजीराव चोरगे कॉलेजमध्ये ‘करिअर संसद’ विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात…

Spread the love

.

*चिपळूण, ता. प्रतिनिधी (संदीप येलये):* डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र (MITC) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत ‘करिअर संसद’  विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ दि. १५ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
          

दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. अंजलीताई चोरगे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश निर्मळ यांनी केले. त्यानंतर करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. आदित्य संतोष जोशी यांची मुख्यमंत्री, सुप्रिया राजेंद्र चौगुले यांची नियोजन मंत्री, सलोनी शाहीर भुवड यांची कायदे व शिस्तपालन मंत्री, आर्यन रामचंद्र खेराडे यांची सामान्य प्रशासन मंत्री, आशिष सचिन शिर्के यांची माहिती व प्रसारण मंत्री, पायल अनंत लांबे यांची उद्योजकता विकास मंत्री, रुद्रव अरविंद चव्हाण यांची रोजगार व स्वयंरोजगार मंत्री, सुकेशनी राजेंद्र पवार यांची कौशल्य विकास मंत्री, समिता संतोष पडयाळ यांची संसदीय कामकाज मंत्री, सुरभी भिकाजी जाधव यांची महिला व बालविकास मंत्री, तर समीक्षा संजय घाग यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना प्राचार्या अंजलीताई चोरगे यांनी पदाची शपथ देऊन त्यांना प्रशस्तीपत्र व बिल्ला लावून गौरव केला.


         

प्रमुख पाहुण्या जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन, करिअर नियोजन, सातत्य, सकारात्मक दृष्टीकोन आणि कौशल्य विकास या पाच सुवर्णमंत्रांच्या माध्यमातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या अंजलीताई चोरगे यांनी करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि करिअर घडविण्यासाठी प्रभावी व्यासपीठ असल्याचे सांगितले. मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. संदीप येलये यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा प्रभावीपणे उपयोग करून नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करावी, असे आवाहन केले.
       
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रिया चौगुले हिने केले, तर आभार प्रदर्शन मुख्यमंत्री आदित्य जोशी यांनी केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page