‘भारताला महासत्ता बनवण्याच्या प्रवासात सिंधुदुर्गचे योगदान मोलाचे असेल’..

Spread the love

स्वातंत्र्यदिनी १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत घालून दिला नवा आदर्श..

मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रवासात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे योगदान अत्यंत मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर पार पडलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. सामाजिक बांधिलकी जपत पालकमंत्र्यांनी स्वतः १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत आरोग्याच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला.

ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना ७ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच अवेळी पाऊस आणि थंडीमुळे बाधित झालेल्या ४२ हजारांहून अधिक आंबा-काजू बागायतदारांना ७९ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.





जिल्ह्यातील पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ अंतर्गत २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नांदगाव येथे भव्य कृषी उत्पन्न बाजार समिती उभारली जात असून, चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग-मुंबईदरम्यान आठवड्याचे सातही दिवस विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. तसेच मौजे शिरोडा-वेळाघर येथे पंचतारांकित ‘ताज’ प्रकल्प साकारत असून, सागरी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील १४ संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर ‘पोर्टा केबिन’ उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेत ‘पवित्र’ प्रणालीद्वारे २८२ प्राथमिक शिक्षकांची भरती लवकरच केली जाणार असून, जलसंधारण अभियानांतर्गत २१ ऑगस्ट रोजी आयोजित वॉकेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.



राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेतल्याबद्दल आरोग्य विभागातर्फे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते पालकमंत्री नितेश राणे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या मुख्य सोहळ्यास आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





गुणवंत, पोलीस व कलाकारांचा गौरव…

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. १५ वर्षे सेवा बजावल्याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्यासह ७ पोलिसांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’, तर २५ वर्षे सेवेबद्दल राखीव पोलीस निरीक्षक रामदास पालशेतकर, पोलीस उपनिरीक्षक संजय साटम यांच्यासह ५ जणांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. प्रतिभावान कलाकार म्हणून पियानो वादक विजय तुळसकर व नृत्यांगना नेहा जाधव, तर आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल रामदास नाईक यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त शरद धुरी, डॉ. उत्तम फोंडेकर, महेश संसारे व संतोष गावडे या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page