रामटेकमध्ये कॉंग्रेसच्या आजी-माजी नेत्यांमध्ये होणार लढत?; राजू पारवेंमुळं राजकीय समीकरण बदललं..

Spread the love

आमदार राजू पारवे यांच्या राजीनाम्यानं रामटेक लोकसभा मतदारसंघाचं राजकीय समीकरण बदललं आहे. त्यांनी आज आमदारकीचा राजीनामा देत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळं विदर्भात काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी आज काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळं रामटेक लोकसभा क्षेत्रातील राजकीय समीकरण पुन्हा बदललं आहे. राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिल्यानं विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळं काँग्रेस बॅकफूटवर गेलाय.

कृपाल तुमानेचा पत्ता कट ??..

रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 10 वर्षापासून शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे रामटेक मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, आज घडलेल्या घडामोडींमुळं कृपाल तुमानेचं तिकीट कापल जाणार असल्याचं जवळजवळ निश्चितचं झालं आहे. कृपाल तुमाने ऐवजी आता राजू पारवे मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे देखील जवळजवळ स्पष्ट झालेल आहे.

राजू पारवे विरुद्ध रश्मी बर्वे…

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट शिवसेनेत प्रवेश करणारे राजू पारवे हे काँग्रेस पक्षाचे आमदार होते. रामटेकची निवडणूक लढवण्यासाठीचं राजू पारवे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचाही राजीनामा दिलाय. तर, काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे या देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यामुळं आता ही निवडणूक काँग्रेसच्या दोन आजी माजी नेत्यांमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजपा आग्रही असताना घेतली माघार…

रामटेक लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षालाच मिळावी, याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं आग्रही होते. गेल्या दहा वर्षात भाजपानं रामटेक लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसह नेत्यांची मोर्चेबांधणी केली होती. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाचं सुटावा याकरिता देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या महिन्याभरापासून चर्चा करत होते. परंतु जागावाटपाच्या वाटाघाटीत अखेर रामटेकची शिवसेनेकडेचं कायम असली, तरी राजकीय समीकरण मात्र, बदललं आहे.

कोण आहेत रश्मी बर्वे…

रश्मी बर्वे यांना काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून जिल्ह्यात ओळखलं जातं. रश्मी बर्वे या माजी मंत्री सुनील केदारांच्या निकटवर्तीय आहे. अवघ्या 37व्या वर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये आपली ओळख निर्माण केलीय. रश्मी बर्वे यांनी कला विभागात स्नातक केलं आहे. 2020 ते 2022 या काळात रश्मी बर्वे यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष म्हणून काम केलं. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page