
पुणे l 08 फेब्रुवारी-‘छत्रपती शिवाजी महाराज हे लाच देऊन आग्र्याहून सुटले, त्यांनी औरंगजेबाच्या वजीराला, त्यांच्या पत्नीला तसंच अनेक सरदारांना लाच दिली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून वगैरे सुटले नाहीत.’ असं वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशातच या प्रकरणावर मंत्री शंभूरराज देसाई यांनी भाष्य केले आहे.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेले विधान निंदनीय आणि निषेधार्ह आहे. तसेच प्रकरणी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाच्या व्हिडिओ क्लिपबाबत तपासणी करावी.’ असं मंत्री देसाई म्हणाले.
पुण्यातील विधानभवन येथे पुणे विभागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला शिंदे गटाचे नेते आणि मंत्री मंत्री शंभूरराज देसाई हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री शंभूरराज देसाई यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शंभूरराज देसाई?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर सरकारकडून कारवाई होणार का? असा प्रश्न शंभूरराज देसाई यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राहुल सोलापूरकर यांनी केलेल विधान निंदनीय आणि निषेधार्ह आहे. तसेच प्रकरणी राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानाच्या व्हिडिओ क्लिपबाबत तपासणी करावी, कोणत्या पार्श्वभूमीबाबत बोलले आहेत. त्याबाबत तपासणी करावी आणि याबाबत सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे. त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांनी केवळ दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. तर रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीवर नाक घासून राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी,’ अशी भूमिका मंत्री देसाई यांनी घेतली आहे.