कोळसावाहु कंटेनर पलटी होवुन झालेल्या अपघातात एक जण ठार , पाच गंभीर तर अन्य पाच जण किरकोळ जखमी…

Spread the love

महामार्गावर राजापूर गाडगीळवाडी येथे भिषण अपघात

राजापूर / प्रतिनिधी – मुबई गोवा महामार्गावर गाडगिळवाडी येथील बस थांब्यानजीक गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कोळसावाहू ट्रकने या ठिकाणी उभ्या असलेल्या चार दुचाकी व क्वालीस गाडीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एकजण ठार झाला असून १० जण जखमी झाले आहेत. यातील पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. सुदेश चंद्रकांत फाटक (४५) रा. शेढे फाटकवाडी असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला आहे.

या अपघातात ट्रक व क्वालीसह चार दुचाकींचे मौठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर ट्रक पलटी झाल्याने डीझेल टाकी फुटुन डीझेल व ऑईल रस्त्यावर पसरल्याने वाहतुक एका बाजुने वळविण्यात आली होती.

उतारावरून वेगाने घसरत येणारा हा ट्रक पाहून अनेकांनी जीव वाजविण्यासाठी पळापळ केल्याने अनेकजण बालंबाल बचावले आहेत. या अपघाताची माहीती मिळताच राजापूर पोलीसांसह अनेकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली व तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

         
गोव्याकडू कोळसा भरून मुंबईकडे जाणारा हा चौदा चाकी मोठा ट्रक महामार्गावर गाडगिळवाडी येथील उतारावरून भरधाव वेगाने आला व हा अपघात झाला. यावेळी या ठिकाणी असलेल्या बस थांब्यावर काही प्रवाशी व काही दुचाकीस्वार आपल्या दुचाकी लावून थांबले होते. तर एक क्वालीस देखील उभी होती. भरधाव वेगात आलेल्या या ट्रकने तेथे उभ्या असलेल्या चार दुचाकींना व क्वालीसला जोरदार धडक दिली. यावेळी वेगाने ट्रक येत असल्याचे लक्षात येता तेथे उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला जीव वाचविण्यासाठी पळापळ केली. मात्र यात या ठीकाणी उभ्या असलेल्या  सुदेश चंद्रकांत फाटक यांना जोरदार धडक बसल्याने ते जागीच ठार झाले तर अन्य काही प्रवाशी जखमी झाले, पुढे या ट्रकने क्वालीस गाडीला देखील जोरदार धडक दिल्याने या क्वालीस मधील चार जण गंभीर जखमी झाले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये  क्वालीस गाडीतील विकास रघुनाथ पाडावे, रघुनाथ भगवान पाडावे, रामदास लक्ष्मण दळवी, श्रावणी रामदास दळवी सर्व रा. कणेरी यांचा समावेश आहे. तर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये मिहिर मिलींद धुळप (१३) रा. कोंढेतड याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या पाचही जणांवर राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे.

 तर किरकोळ जखमींध्ये ट्रक चालक अंबालाल श्रीरामजी बाट (४५) रा क्लीनर असलम खान, उदयपुर या दोघांसह उभ्या असलेल्या प्रवाशांमधील रेश्मा दिगंबर फाटक, शुभ्रा प्रफुल्ल फाटक रा. शेढे फाटकवाडी, सर्वेश उमेश सुर्वे (१८) रा. मुंबई सध्या रा. कोंढेतड यांचा समावेश आहे. या सर्व जखमींवर राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टर मोहनिश शिवदे, डॉ. हर्षानी बुरानी यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार केले.

या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, उपनिरीक्षक मोमीन शेख यांसह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना मदत केली व पंचनामा केला. तर स्थानिक ग्रामस्थांसह राजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेकांनी अपघातस्थळी व राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली व अपघातस्थळी पोलीसांना सहकार्य केले.

राजापूर शहरालगत झालेल्या या अपघाची माहिती मिळताच अनेकांनी अपघातस्थळी धाव घेतल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती. मात्र हा अपघात कसा झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला की कसा काय याचा पोलीस तपास करत आहेत.

पोलीस कर्मचारी बालंबाल बचावले

या अपघाताच्या अगोदर काही क्षण राजापूर पोलीस स्थानकाच्या ११२ या गाडीचे चालक प्रसाद शिवलकर व पोलीस कर्मचारी श्रीमती निता वरक हे पेट्रोलिंगसाठी या भागात गेले होते. त्यांनी अपघात झाला त्या ठिकाणाच्या काही अंतरावरच आपली गाडी उभी केली होती, मात्र गाडी उभी करताना त्यांनी रस्त्याच्या बाजुला योग्य रित्या अंतर ठेवून उभी केल्याने गाडीसह हे दोन्ही कर्मचारी बालंबाल बचावले आहेत. भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने त्यांच्या पुढयातच समोर प्रवाशी व क्वालिसला धडक दिली.  कर्तव्यावर असलेल्या या दोघांनीही क्षणाचा विलंब न लावता तात्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढत रूग्णालयात नेले. तर तात्काळ पोलीसांना याबाबत माहिती दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page