उत्तरेकडील वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारीवर परिणाम; समुद्रातील मासळी गायब…

Spread the love

रत्नागिरी- उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. या वाऱ्यांमुळे समुद्रातील मासे गायब झाले असून, गिलनेटने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी नौका बंदरातच उभ्या करून ठेवल्या आहेत. तर ट्रॉलिंग, फिशिंगच्या नौकाही परिस्थिती पाहून समुद्रात जात आहेत.

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना मासळी मिळत होती. मात्र, नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीवर परिणाम हाेऊ लागला. त्यामुळे बहुतांशी वेळा मासेमारी ठप्पच राहत हाेती. गेले अनेक दिवस किनारपट्टी भागात गार वारे वाहू लागले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे समुद्रात मासेमारीकरिता गेलेल्या मच्छीमारांची तारांबळ उडत आहे. छोट्या मच्छीमारांना मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी ओढताना त्रास होत असून, नौका कलंडण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक मच्छीमार माघारी परतले आहेत. काहींनी जवळच्या बंदरात व खाडीत सुरक्षिततेसाठी आधार घेतला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती अजून दोन दिवस राहणार आहे. ट्रॉलिंगने मासेमारी करणारे मच्छीमार धोका पत्करून समुद्रात जात आहेत. पण, नौका स्थिर राहत नसल्यामुळे जाळी टाकता येत नाही. या कालावधीत मासेही मिळत नसल्याने मच्छीमारांची अडचण हाेत आहे. वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, मासळी खोल समुद्रात गेली आहे. त्यामुळे अनेकांनी नाैका बंदरातच ठेवल्या आहेत. समुद्रात वाहणारे वारे थांबण्याची प्रतीक्षा मच्छीमारांना आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page