65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा बदलली घटना, तेव्हा तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं; नारायण राणेंचा राहुल गांधींना सवाल…

Spread the love

काँग्रेसनं 65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा घटना बदलली, त्यावेळेला तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं, असा सवाल नारायण राणे यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधींना केलाय.

रत्नागिरी : आम्ही संविधान बदलणार, असं विरोधी पक्ष खोटं सांगत फिरत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही दैवत मानतो. काँग्रेसनं 65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा घटना बदलली, त्यावेळेला तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं, असा सवाल नारायण राणे यांनी कॉंग्रेस आणि राहुल गांधींना केलाय. तसंच हे एक नंबरचे खोटारडे असल्याची टीका यावेळी राणेंनी केली. हातखंबा इथं महायुतीचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण, उदय सामंत, किरण सामंत उपस्थित होते.

यांच्याकडं विरोधी पक्षनेता नाही…

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, “विरोधी पक्ष मोदींना तडीपार करायला निघाला आहे. आमचे 303 खासदार आहेत, आता 400 च्या पुढं जाणार आहोत. कोण विरोधी पक्ष समोर उभा आहे, काँग्रेसकडं 50 खासदार आहेत. विरोधी पक्ष नेता पण त्यांच्याकडं नाही. शरद पवार यांच्याकडं 3 खासदार, शिवसेना उद्धव गटाकडे 5 खासदार आहेत. सर्व विरोधक मिळून 55 खासदार आहेत, अरे आम्ही तीनशेच्या वर आहोत आणि हे आम्हाला तडीपार करायला निघाले आहेत.”

उद्धव ठाकरेंची लायकी काय…

यावेळी राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर ही निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरीतल्या सभेला 135 लोकं, आमच्या मोदी साहेबांची सभा 117 एकरमध्ये, 4 लाखापेक्षा जास्त लोकं होती. यांचे 135 लोकं, काय लायकी आहे यांची? फक्त विरोधाला विरोध करतात. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, काहीही झालं तरी मी हिंदुत्वाचा त्याग करणार नाही. या उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचं चॉकलेट दाखवल्यावर, हिंदुत्व बाजूला ठेवलं आणि हे शरद पवारांच्या मांडीवर बसले. काँग्रेसला सोबत घेतलं आणि अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले, यांनी महाराष्ट्राला काय दिलं,” अशी टीका यावेळी राणेंनी केली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page