
कोलकत्ता- इंडिया आघाडीत मागील काही दिवसांपासून जागा वाटपावरुन बोलणी सुरु होती. पण यात बोलणी कमी आणि वादविवाद होता, असं समोर येतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक एकट्या लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. ममतांच्या या घोषणेने इंडिया आघाडीसमोर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. आज त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. त्यांनी पश्चिम बंगलामध्ये स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून जागा वाटपावरुन वादविवाद सुरु होते. या दोन्ही पक्षांमध्ये त्याबाबत एकमत झालं नाही. म्हणून TMC ने एकट्याने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत. काँग्रेससोबत माझी कुठलीही चर्चा झालेली, नाही, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.
टीएमसीने काँग्रेसला दोन जागा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने 42 पैकी दोन जागा जिंकल्या होत्या. पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी याबाबत जोरदार वक्तव्य केलं होतं. याअगोदरही आम्ही दोन जागा जिंकल्या होत्या, आताही जिंकू शकतो, असं ते म्हणाले होते. पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार, असं सुरुवातीपासून आम्ही सांगत आलो आहेत. आमचा पक्ष एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. स्वबळावर भाजपाला हरवू शकतो. आम्ही अजुनही इंडिया आघाडीचा भाग आहे, असंही त्यांनी सांगितलं. राहुल गांधी यांची न्याय यात्रा पश्चिम बंगालमधून जाणार आहे. पण त्याबद्दल आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही, असं त्या म्हणाल्या.