![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/04/1000410849.jpg)
मुंबई | कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग तयार होण्यासाठी लागलेला विक्रमी वेळ पाहता, आहेे तोच रस्ता आधी पूर्ण करा, अशी बोलण्याची वेळ कोकणी माणसावर आलेली आहे. असे असताना, सरकार आता पनवेल ते गोवा सहा पदरी द्रुतगती मार्गाची योजना आखत आहे. या प्रकल्पासाठी जवळपास २५ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते विकासाच्या माध्यमातून महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. याता आता मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी दोन नवीन मार्ग तयार होणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग आणि कोकण सागरी महामार्ग असे हे दोन महामार्ग करण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यात मुंबई ते कोकण तथा गोवा हा प्रवास जलद होणार आहे.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/04/1000410848.jpg)
कोकण द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार असून हा सहा पदरी महामार्ग असणार आहे. त्याची लांबी ३८८ किलोमीटर लांबीची राहणार आहे. हा मार्ग पनवेल येथून सुरु होणार आहे. तसेच हा रस्ता गोवा-महाराष्ट्र सीमेवर येऊन संपणार आहे. या महामार्गामुळे प्रवासाचा चार ते पाच तासांचा कालावधी वाचणार आहे. सध्या मुंबई ते गोवा राज्याची सीमा या प्रवासासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे.
ज्यावेळी हा महामार्ग पूर्णपणे डेव्हलप होईल तेव्हा हा प्रवास फक्त तीन ते चार तासांत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास २५ हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याशिवाय मुंबई ते गोवा हा प्रवास जलद व्हावा यासाठी रेवस ते रेडी दरम्यान कोकण सागरी मार्ग विकसित केला जाणार आहे.
हा मार्ग ४९८ किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तथापि या दोन्ही प्रकल्पाच्या कामासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे.राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हे महामार्ग करण्यात येणार आहेत.
रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. हा ७०१ किलोमीटर लांबीचा महामार्ग असून आत्तापर्यंत ६२५ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. उर्वरित ७६ किलोमीटर लांबीचा मार्ग देखील जुलै २०२४ मध्ये सुरू होईल अशी आशा आहे. याच धर्तीवर हा कोकण द्रुतगती महामार्ग केला जाणार असल्याचे समजते.