
राजापूर | जानेवारी १३, २०२४.
राजापूर तालुक्यातील झर्ये-कारवली या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ भाजपा नेत्या, राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मा. मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व तत्कालीन ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंढे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ५.५० कि.मी. लांबीच्या या रस्त्यासाठी ६ कोटी ४१ लाख इतका भरीव निधी मंजूर करून आणल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तानाट्य, कोरोना आदी अडथळ्यांची मालिका सुरु झाल्याने आजपर्यंत अर्धवट राहिला. मात्र पुन्हा एकदा देवेंद्रजी सत्तेत आले आणि त्यांच्याकडे या रस्त्याच्या कामाचा विषय काढून विद्यमान ग्रामविकास मंत्री ना. गिरीशजी महाजन यांच्या सहकार्याने अखेर कामाला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे.”
यावेळी काही ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्त्याचे काम अडवण्याचा प्रयत्न केला. याबाबत सौ. उल्काताई आणि सहकाऱ्यांनी निराकरण केले. मात्र काही अदृष्य शक्तींनी चिथावणी दिल्याने या ठिकाणी थोडी बाचाबाची झाली. मात्र सौ. विश्वासराव व त्यांचे सहकारी ग्रामस्थांसह आपल्या भूमिकेवर कायम राहिल्याने आक्रमक पावित्र्यात आलेल्यांना माघारी फिरावे लागले.
याबाबत बोलतना सौ. विश्वासराव म्हणाल्या, “मागील अनेक वर्षे या भागाचे प्रतिनिधित्व करणारे नेते जनतेच्या आकांक्षा सोडाच, साध्या मुलभूत सुविधा पुरवण्यात यशस्वी ठरले नाहीत; एक महिला म्हणून मी पुढाकार घेतला आणि काम मंजूर करून आणले तर यातही अडवणूक करण्याचा दुर्दैवी प्रकार आज सर्वांच्या समक्ष करून येथील नेत्यांनी आपली संकुचित आणि विकासविरोधी जनताद्रोही भूमिका स्पष्ट केली. अशा प्रवृत्तींचा मी जाहीर निषेध करते. आमच्याच गावातील सर्वसामान्य जनतेची माथी भडकावून विकासकामांत राजकारण करणाऱ्या लोकांना आता जनताच उत्तर देणार. मी माझे काम करत राहणार, आत्ता मी फार काही बोलणार नाही. माझ्या माणसांची मी समजूतही काढेन पण आता स्वस्थ बसणार नाही.”