
मुंबई- धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक शनिवारी सकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि तीन तासांनी परत आले. सोलापुरातून नागपूरला येऊन ते दिल्लीला गेले होते. सोलापूर येथे त्यांना केंद्रात मंत्रिपदाविषयी विचारल्यावर त्यांनी संत तुकाराम महाराजांचा ‘जे जे होईल, ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ हा अभंग उद्धृत केला. त्यानंतर फडणवीस केंद्रात शिक्षणमंत्री होणार असे वक्तव्य संजय राऊत यांनी करताच चर्चांना उधाण आले.
दिल्लीत फडणवीस नेमके कुणाला भेटले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, ‘फडणवीसच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील,’ असा दावा फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू कोअर टीमने केला. त्यांचे म्हणणे आहे की, दिल्ली दौरा पूर्वनियोजित होता. प्रधानांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंची वर्णी लागू शकते. मंत्री आशिष शेलारांवर केंद्रीय संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यावर चर्चेसाठी हा दौरा होता.
फडणवीस उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणमंत्रिपदाची संधी : राऊत..
संजय राऊत म्हणाले की, देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून फडणवीसांना संधी मिळू शकते. ते उच्चशिक्षित आणि वकील आहेत. ते विविध विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांना केंद्रात नेण्याबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे योगायोगाने किंवा त्यांच्या दुर्दैवाने, त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“पांडुरंगाची इच्छा असेपर्यंत मी या पदावर राहणार- देवेंद्र फडणवीस..
दिल्लीतील संभाव्य केंद्रीय जबाबदारीविषयीच्या थेट प्रश्नावर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत फडणवीस म्हणाले, “जे दिलं, ते उत्तम आहे… तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधानी… तसा मी पूर्णपणे समाधानी आहे. पांडुरंगाची इच्छा असेपर्यंत मी या पदावर काम करत राहणार आहे. आपण किती काळ पदावर राहिलो यापेक्षा मिळालेल्या वेळेचा नेमका काय उपयोग केला आणि जनतेच्या हितासाठी काय ठोस काम केले, हेच जास्त महत्त्वाचे आहे.”
पवारांचा श्रेयवाद आणि विलीनीकरणाची चर्चा..
पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय घेतले. दोन दिवसांपूर्वी मी मोदी-दिपकेंना भेटल्याचे परिणाम दिसत आहेत, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे फडणवीसांचा दौरा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाविषयी होता, अशीही चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याविषयी फडणवीसांचे मत जाणून घेतले, असे म्हटले जात आहे.
२४ जुलै रात्री १० ते २५ जुलै सायंकाळी ६ पर्यंतच्या घडामोडी..
२४ जुलै रात्री १०: अमृता फडणवीस म्हणाल्या, मी महाराष्ट्रात राहणार आणि देवेंद्रजींनाही महाराष्ट्रातच ठेवणार आहे.स. ११:३०
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर विमानतळ येथून मुंबईकडे जाण्याऐवजी नागपूरकडे रवाना झाले.
२५ जुलै ,सकाळी ६ वा. : पत्रकार परिषदेत फडणवीस : “पांडुरंगाची इच्छा असेपर्यंत काम करायचे आहे; किती काळ पदावर राहिलो यापेक्षा त्या काळाचा लोककल्याणासाठी कसा उपयोग केला, हे महत्त्वाचे.”
सकाळी ८:३० : दिल्लीतून निरोप येताच मुख्यमंत्री पंढरपूर येथून सोलापूरला रवाना.दुपारी २:३०
मुख्यमंत्र्यांचे विमान दिल्लीत पोहोचले. तेथे त्यांनी नेमकी कुणाची भेट घेतली, याचा अचूक तपशील उपलब्ध नाही.
सायंकाळी ५.३०
दिल्लीतील नियोजित बैठका आटोपून ३ तासांत फडणवीस नागपूर शहरात परत आले.
ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा..
विद्यार्थी लाठीहल्लाप्रकरणी राज, उद्धव ठाकरे २६ जुलैला तिरंगा मोर्चा काढणार होते. मात्र, प्रधानांच्या राजीनाम्यामुळे त्यांनी मोर्चा रद्द केला आहे. त्याऐवजी शिवाजी पार्कला विजयी मेळावा होईल.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*