
मुंबई- राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखता राज्यातील सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये पावसामुळे उद्या (दि. 2 जुलै) सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दुसरीकडे, राजधानी मुंबईलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले असून पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहता शहरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. हंगामातील पहिल्याच जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांनी कामानिमित्त घराबाहेर पडताना योग्य ती काळजी आणि विशेष खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कल्याण शिळफाटा रस्ता पाण्याखाली…
कल्याण-डोंबिवलीत सुरु असलेल्या पावसामुळे शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. विशेष म्हणजे रस्त्यालगत उभ्या असलेले चारचाकी वाहने हे जवळपास पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे इथे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच पावसामुळे शीळरोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?..
हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहता विविध जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या अंदाजानुसार, आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पालघर जिल्ह्याला 2 जुलै, रायगड जिल्ह्याला 3 व 4 जुलै, तर ठाणे जिल्ह्याला 4 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक राहील. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी 2, 3 आणि 4 जुलै तर सातारा जिल्ह्यातील घाट परिसरासाठी 5 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील दोन-तीन तासांसाठी जिल्हानिहाय तात्काळ हवामान इशारा

मराठवाड्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता…
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राव्यतिरिक्त, उर्वरित महाराष्ट्राबाबतही प्रादेशिक हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. आज मराठवाड्यातील बहुतांश भागात आणि उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. तसेच, दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी काय सांगितले?..
IMD चे शास्त्रज्ञ बिक्रम सिंग म्हणतात, “गेल्या 24 तासांत चांगला पाऊस झाला असून, मुंबईतील अनेक केंद्रांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आजही आम्ही मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. साहजिकच, सखल भागांमध्ये पाणी साचणे किंवा जलमय परिस्थिती निर्माण होणे असे प्रकार घडू शकतात. आम्ही बीएमसी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला याबाबत सातत्याने माहिती देत आहोत. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक ती कार्यवाही करतील. तसेच रत्नागिरीसाठी आम्ही ‘रेड अलर्ट’ कायम ठेवला आहे, कारण त्या भागात आधीच अत्यंत मुसळधार पाऊस पडत आहे,” अशी माहिती सिंग यांनी दिली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*


