
*रत्नागिरी:* गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या कर्ला येथे संजय वालम यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय वालम यांच्या घराचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले होते. या घरासाठी चिऱ्याची संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र, चार दिवसांच्या संततधार पावसामुळे ही भिंत कोसळली, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घर बांधण्यापूर्वीच दरड कोसळल्याने वालम यांना नुकसानीचा सामना करावा लागला आहे. पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.