जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली…

Spread the love

*रत्नागिरी:-* जिल्हाभरात पावसाची संततधार कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाच्या सरींवर सरी कोसळत होत्या. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिणामी खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान रविवार पर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान मागील 24 तासात जिल्ह्यात 68.86 च्या सरासरीने 619.77 मिली मीटर पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात 143.50 मिमी, दापोली 69.57 मिमी, खेड 73.85 मिमी, चिपळूण 55.66 मिमी, गुहागर 40.80 मिमी, संगमेश्वर 65.4, रत्नागिरी 41.88 मिमी, लांजा 73.60 मिमी आणि राजापूर तालुक्यात 55.50 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
मंडणगड आणि खेड तालुक्यात पडलेल्या मोठ्या प्रमाणावरील पावसामुळे खेड तालुक्यातून वाहणार्‍या जगबुडी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पातळी धोक्याच्या पातळीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्याचा परिणाम आता जगबुडी नदीवरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद मंडणगड तालुक्यात झाली असून, गेल्या २४ तासांत तब्बल 143 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीवर आमचे सातत्याने लक्ष असून प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू असे प्रशासनाने आव्हान केले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page