श्रीलंकेने भारताच्या तोंडचा घास पळवला; भारत- श्रीलंका पहिला वनडे सामना झाला टाय..

Spread the love

*कोलंबो-* टी-२० मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघाने वनडे मालिकेलाही चांगली सुरुवात केली आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने कडवी झुंज दिली. परंतु हा सामना टाय झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाची पावरपॅक बॅटिंग लाईनअप पाहता, भारतीय संघासाठी हे आव्हान खूप कमी होतं. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना घाम फोडला. दरम्यान हा सामना बरोबरीत समाप्त झाला आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून ७५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. रोहितने ४७ चेंडूंचा सामना करत ५८ धावा चोपल्या. तर शुभमन गिल १६ धावा करत माघारी परतला. १० महिन्यांनंतर वनडेत कमबॅक करत असलेल्या विराट कोहलीला या सामन्यात शानदार सुरुवात मिळाली. मात्र त्याला सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. तो २४ धावा करत माघारी परतला.

भारतीय संघाची शानदार सुरुवात झाल्यानंतर मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सामना फिरवला. सामना श्रीलंकेच्या बाजूने झुकत होता. मात्र केएल राहुल आणि अक्षर पटेलने महत्वपूर्ण भागीदारी करत कमबॅक करुन दिलं. अक्षर पटेलने ३३ तर केएल राहुलने ३१ धावांची खेळी केली. शेवटी शिवम दुबेने महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलं. मात्र शेवटी श्रीलंकेने दमदार कमबॅक केलं. भारतीय संघाला विजयासाठी शेवटी ५ धावांची गरज असताना शिवम दुबे स्ट्राईकवर होता. त्यावेळी त्याने चौकार मारला आणि धावसंख्या बरोबरीत आणली. मात्र पुढच्याच चेंडूवर चरीथ असलंकाने त्याला पायचित केलं. यानंतर अर्शदीप सिंगलाही पायचीत करत हा सामना श्रीलंकेने बरोबरीत सोडवला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page