
जनशक्तीचा दबाव 10 जुलै – राजापूर: कोकणच्या आर्थिक विकासासाठी आणि रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून भावी पिढीला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाला विरोध करून कोकणी जनतेचा घास हिरावू पाहणाऱ्या यापुढे थारा नाही, जे या प्रकल्पाला विरोध करतील, विरोधासाठी येतील त्यांना परत जाऊ देणार नाही असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला. पक्षाचे राजकारण न करता लोकांच्या पोटाचे राजकारण करा असा सल्लाही यावेळी खासदार नारायण राणे यांनी प्रकल्प विरोधकांना दिला.
साडेतीन लाख हजार कोटीच्या या प्रकल्पामुळे संपूर्ण कोकणचेच नाही तर राज्य आणि देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार नारायण राणे यांनी यावेळी दिली.
आज मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांनी राजापूर शहर व परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली. या पाहणीनंतर राजापूर नगर वाचनालयात आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी विजयासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारांचे आभार व्यक्त केले. भविष्यात आपल्याला विकास करायचा आहे असे नमुद करत विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
कोकणच्या विकासासाठी औद्योगिक प्रगती काळाची गरज असल्याचे सांगत राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पासाठी कंपनीला आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा राज्य व केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील असेही खासदार नारायण राणे यांनी सांगितले. या प्रकल्पाला आता पोषक वातावरण असून विरोध नाही, याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांशी मी बोललो असल्याचेही खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
कोकणातील तरूणांनी उद्योजक बनले पाहिजे असे सांगत कोकणातील उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण केले पाहिजेत, शोधले पाहिजेत, त्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी खासदार नारायण राणे यांनी दिली.
यावेळी खासदार नारायण राणे यांचा राजापूर अर्बन बँक, राजापूर तालुका व्यापारी संघटना यांसह अनेक संस्था व पदाधिकारी यांनी सत्कार केला.
यावेळी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, भाजपा महिला आघाडीच्या सौ. उल्का विश्वासराव, प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस अनिलकुमार करंगुटकर, प्रदेश महिलास सरचिटणीस सौ. शिल्पा मराठे, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, पुर्व मंडळ तालुकाध्यक्ष भास्कर सुतार व पश्चिम मंडळ तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, जब्बार काझी, अरविंद लांजेकर, भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.