
नागपूर : राज्यात २३५९ ग्रामपंचायत पैकी भाजपाने एक हजारच्यावर ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ते आज निवडणुकीच्या निकालानंतर नागपूर येथे बोलत होते. भाजपाचं सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी महायुतीने सतराशे पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा त्यांनी केलाय. (BJP State President) भाजपा आणि महायुतीनं जिंकलेल्या सर्व ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात होत्या. त्या आता भाजपा आणि महायुतीकडे आल्या असं ते म्हणाले आहेत. निवडणुकीत काँग्रेस आणि इतर पक्षांना मोठा फटका बसलेला आहे असं देखील ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नेतृत्व जनतेला मान्य
महायुतीनं ग्रामपंचायतीत चांगलं यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे. त्यांचं नेतृत्त्व जनतेनं मान्य केलं आहे. त्याचाच हा परिपाक आहे. तसंच विरोधी पक्षानं म्हटलं होतं की, या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल. मात्र महायुतीनं घवघवीत यश मिळवलं आहे. येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीची ही एक लिटमस लेस्ट होती. या टेस्टमध्ये महायुती पास झाली आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली आहे.