
पॅरा नाही तर सामान्य खेळांडूंसोबतही शीतल अतिशय उत्तम नेमबाजी करते.
दिल्ली- कोणताही खेळाडू म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो धडधाकट शरीर असलेली व्यक्ती. पण विशेष व्यक्तींसाठी असलेल्या स्पर्धा पाहिल्या की आपला स्वत:च्या डोळ्यांवरच विश्वास बसत नाही. शारीरिक समस्या असताना अगदी सामान्यांप्रमाणे आणि त्याच जिद्दीने खेळणारे खेळाडू पाहिले की आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असेच काहीसे एशियन पॅरा गेम्समध्ये झालेल्या स्पर्धेत पाहायला मिळाले. नेमबाजीमध्ये भारताच्या शीतल देवी हिने २ सुवर्ण पदकं जिंकत इतिहास रचला आहे. एकाच सत्रात २ सुवर्णपदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. दोन्ही हात नसताना पायाने निशाणा साधत शीतलने अतिशय उत्तम आणि अंगावर शहारे आणणारी खेळी केली त्यामुळे जगाच्या पाठीवर भारताचे नाव उंचावले आहे.

शीतल ही मूळची जम्मू-काश्मिर येथील असून ती अवघ्या १६ वर्षांची आहे. जन्मापासून दोन्ही हात नसलेल्या शीतलचे जगणे किती कठिण असेल याची आपण कल्पना करु शकतो. पण अशात तिने हार न मानता जिद्दीने काहीतरी करायचे ठरवले आणि जे केले त्यामध्ये यश मिळवून दाखवत स्वत:ला सिद्ध केले. किश्तवाडच्या दुर्गम भागात राहणाऱ्या शीतलला भारतीय लष्कराने लहानपणीच दत्तक घेतले होते. तिच्यासाठी छाती आणि पायाने चालवले जाणारे विशेष धनुष्य तयार करुन घेतले. अतिशय कमी कालावधीत हा खेळ आत्मसात करत शितलने यामध्ये प्रभुत्व मिळवले आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत आपल्यातील चमक दाखवून दिली. पॅरा नाही तर सामान्य खेळांडूंसोबतही शीतल अतिशय उत्तम नेमबाजी करते.

त्यामुळे आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचे शल्य न ठेवता जे आहे त्यावर लक्ष देऊन एखादी गोष्ट करायचे ठरवले तर काहीच अवघड नसते हेच शीतलने जगाला दाखवून दिला आहे. जगभरात आता हात नसलेले ६ नेमबाज असून शीतलचाही त्यामध्ये समावेश झाला आहे. शीतल अतिशय सामान्य कुटुंबातील असून तिचे वडील शेतीचे तर आई शेळी पालनाचे काम करते. पण भारतीय लष्कराने तिच्यातील गुणवत्ता हेरुन तिला योग्य ते मार्गदर्शन केल्याने आज जगाच्या पाठीवर भारताचे आणि स्वत:चे नाव रोषण करणारी शीतल अनेकांसाठी आदर्श खेळाडू ठरली आहे. भारताने पॅऱा एशियन गेम्समध्ये आतापर्यंत विविध खेळांमध्ये ९४ पदके जिंकली आहेत.