
चिपळूण : मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये घरे, गोठे, सभागृह यांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परशुराम घाटातील गॅबियन भिंतीच्या पायथ्याची माती दिवसेंदिवस सरकत असल्याने पेढे गावाला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत पेढे गावचे माजी सरपंच प्रवीण पाकळे यांनी माळीण सारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शासन- प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. पेढे गावाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या गटातील दरड प्रवणभागांचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणावर संरक्षणात्मक उपाय योजना राबवल्या होत्या. दरडी रोखण्यासाठी गॅबियन भिंती उभारल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी या भिंतीच्या पायथ्याशी असलेली माती सरकू लागली आहे. हा प्रकार दिवसेंदिवस घडत असून मंगळवारी पुन्हा एकदा ही घटना घडली होती.
या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे .प्रवीण पाकळे म्हणाले की, गॅबियन भिंतीच्या पायथ्याशी असलेली माती सरकू लागली आहे. तसेच पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग बनवण्यात आला होता, तो देखील तुटून पडला आहे. डोंगराला भेगा पडल्या आहेत. यामुळे महामार्गाला समांतर पिलर पूल बांधावा तरच त्या डोंगराला मजबुती मिळेल, अशी मागणी केली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*