जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०७, २०२३.
देवरूख | निलेश जाधव
कर्नाटकमधून रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडकडे साखरेची पोती घेऊन जाणारा ट्रक रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दरीत कोसळला. या अपघातातून चालक बालंबाल बचावला असून तो जखमी झाला आहे. हा अपघात काल सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत साखरपा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणा इरा चावडा (रा. पोरबंदर गुजरात) हा आपल्या ताब्यातील बारा चाकी ट्रक (जीजे ११ झेड ०७३७) कर्नाटक ते जयगड असा साखर घेऊन जात असताना आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ हा ट्रक आला असता ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळला.
या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला असून अपघाताचे वृत्त समजताच साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यावेळी साखरपा दुरक्षेत्राचे सागर उगळे, तानाजी पाटील, वारके व त्यांचे अन्य सहकारी वरीष्ठांसह मदत कार्यात सहभागी झाले. अपघाताचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, आंबा घाटात वाहने दरीत कोसळण्याच्या घटना वाढीस लागल्या असून या घटना रोखण्यासाठी संबंधित विभागाने आंबा घाटात उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.