ढोल ताशांच्या गजरात श्रीशिवशंभुंचा जयघोष करण्यासाठी कसबा नगरी सज्ज !
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/02/1000325771.jpg)
कसबा /संगमेश्वर- माघ शु. सप्तमी म्हणजेच आंग्ल दिनांक १६ फेब्रुवारी रोजी संभाजी महाराजांचा ३४२ वा राज्याभिषेक दिन आहे आणि हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती गादीला ३५० वे वर्ष पूर्ण होत आहे. अशा या पावन मुहूर्तावर स्वराज्याचे पहिले युवराज, दुसरे छ्त्रपती श्री संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा श्रीक्षेत्र कसबा-संगमेश्वर ठिकाणी साजरा होणार आहे. कसबा म्हणजे धर्मनगरी, त्रिनदी संगमावरील ज्या संगमेश्वर देवस्थनामुळे या स्थानाला संगमेश्वर ही ओळख प्राप्त झाली, त्याच कसब्यामध्ये शंभूराज्एकमेव बहुत काळ वास्तव्य केले.
इथेच शंभुराजे बेसावध असताना घात करुन त्यांना पकडले. खऱ्या अर्थाने श्रीशंभूछत्रपतींच्या बलिदानाची सुरुवात झाली ती इथेच, या भूमीत. श्री क्षेत्र वढू-तुळापूर प्रमाणेच संभाजी महाराजांच्या जीवनपटलावरील आणि इतिहासाच्या कालपटावरील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे ठिकाण, जिथे स्वतः श्री शंभू छत्रपतींनी रुद्राप्रमाणे, श्रीपरशूरामा प्रमाणे अनेक धर्मकृत्य केली, ते ठिकाण म्हणजे कसबा. याबाबत हिंदू समाजामध्ये जागृती व्हावी, धर्मवीर श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजी महाराज यांच्या वैचारिक पाऊल खुणांवर चालणारी पिढी हिंदू समाजात घडावी, या एकमेव उद्देशाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा नित्यपुजन आणि १६ फेब्रुवारी रोजी हा भव्य राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे,असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सकल हिंदू समाज व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत, तसेच या कार्यक्रमाला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व श्रीशिवशंभूपाईकांनी आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.