महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘बेस्ट’चा मोठा निर्णय; दादरहून चैत्यभूमीला दर १५ मिनिटाला बस सोडल्या जाणार…

Spread the love

मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दरवर्षी चैत्यभूमीवर भीम अनुयायी येत असतात. यावर्षी शुक्रवारी महापरिनिर्वाण दिवस असून मोठ्या प्रमाणात लाखो भीम अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांना चैत्यभूमी येथे जाता यावे यासाठी बेस्टने बसफेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी बेस्टकडून चैत्यभूमीसाठी ४ ते ७ डिसेंबर दरम्यान, दर १५-२० मिनिटाला बस सोडल्या जाणार आहेत. या बस दादर रेल्वे स्थानकापासून सोडल्या जाणार आहेत. या सोबतच नागरिकांना ६० रुपयांत पास देखील दिला जाणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे चैत्यभूमी असून या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी दरवर्षी येत असतात. या ठिकाणी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये या साठी रेल्वे व बेस्ट प्रशासनामार्फत दरवर्षी विशेष नियोजन केलं जातं. यावर्षी देखील मुंबई व बाहेरगावाहून येणाऱ्या अनुयायांसाठी दादर स्थानक ते शिवाजी पार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता दादर रेल्वे स्थानक येथून विशेष बस सोडल्या जाणार आहेत.

उद्या ४ तारखेपासून ही बस सुविधा सुरू केली जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बसमार्ग क्रमांक २००, ३४१, ए ३५१ आणि ३५४ या बस या मार्गावर चालवल्या जाणार आहे. तर ६ तारखेला शिवाजी पार्क येथूनही सी ३३, ए १५६४, २४१, सी ३०५, ए ३५१, ३५४, ए-३५७, ए-३८५, सी-४४० आणि सी-५२१ या बसमार्गावर अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. या बसही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळून उपलब्ध करण्यात येतील. सकाळी ७.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या फेऱ्या सुरू राहणार आहेत. दरम्यान, प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था या सह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतुकी देखील मोठा बदल करण्यात येणार आहे. नागरिकांना हा वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page