
रत्नागिरी: बुधवारी रात्री काढण्यात आलेले मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचं बॅनर अखेर भाजपा, हिंदुत्ववादी संघटना आणि रत्नागिरीकरांनी एकत्र येऊन पुन्हा पेठकिल्ला येथे उभे तर केलंच परंतु मिरकरवाड्याच्या प्रवेशद्वारावर सुद्धा ना. नितेश राणे यांचा भव्य बॅनर लावण्यात आलं. या वेळेला उपस्थितांनी जय श्रीराम, भारत माता की जय, नितेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि नितेश राणे अंगार है बाकी सब भंगार है या घोषणा देऊन सगळा परिसर दुमदुमून टाकला होता.
२७ जानेवारी रोजी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील 319 अनधिकृत बांधकामे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर मत्स्य व्यवसाय विभागाने जमीनदोस्त केली. त्यावेळेला सक्रिय विरोध झाला नसला तरीही ही कारवाई थांबवावी यासाठी अनधिकृत बांधकामधारकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. मात्र त्यांच्या विरोधाला आणि त्यांच्या या मागणीला मत्स्यव्यवसाय विभागाकडून कोणतीच साथ मिळाली नव्हती. 27 जानेवारी रोजी अनधिकृत बांधकामे काढल्यानंतर गेली अनेक दशक रखडलेला हा प्रश्न ना. नितेश राणे यांनी मार्गी लावल्याबद्दल समस्त रत्नागिरीकरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या धडक कारवाईचे कौतुक केलं होतं. तर रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी त्यांना धन्यवाद देणारे आणि त्यांना हिंदू योद्धा म्हणून संबोधणारे फलक सर्वत्र झळकले होते.
असं असताना बुधवारी रात्री पेठकिल्ला येथे लावण्यात आलेला त्यांचा बॅनर अचानकपणे काढला गेला होता. सुरुवातीला ही नगरपरिषदची कारवाई आहे असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु माहिती घेता या फलकाची विटंबना केल्याचा संशय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना तसेच रत्नागिरीकरानी व्यक्त केला होता. याच्या विरोधात गुरुवारी रात्री सर्वच रत्नागिरीकर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात जमले होते. आणि अशा समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या वेळेला करण्यात आली होती. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा नोंदवली आहे.