”मोदी चुकीचं बोलत आहेत, मी मुख्यमंत्री असताना…” पवारांचा पंतप्रधानांवर थेट हल्ला

Spread the love

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला आरक्षणावरुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. महिला आरक्षणाबद्दल मोदी जे बोलत आहेत, ते चुकीचं असून यापूर्वी महिला आरक्षणासंदर्भात अनेकदा अनेक निर्णय झालेले आहेत, हे पवारांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका करताना महिला आरक्षणाला विरोधकांनी नाईलाजाने समर्थन दिल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, संसदेत महिला आरक्षणाचा निर्णय एकमताने घेतला. दोन सदस्य सोडले तर कुणीही याला विरोध केला नाही. एक सूचना होती की, घटनात्मक दुरुस्ती करताना ओबीसींना देखील संधी द्यावी. ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधान यांनी काँग्रेस आणि काही लोकांनी नाईलाजाने पाठिंबा दिल्याचं म्हणणं चुकीचं आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, १९९३ साली महाराष्ट्राचे सूत्र माझ्याकडे होते. त्यावेळी राज्य महिला आयोग आम्ही स्थापन केला. आपलं राज्य हे पहिलं राज्य होतं. शिवाय स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू केला आणि महिलांना आरक्षणाचा निर्णय घेतला.
”महिला आरक्षणावर यापूर्वीदेखील चर्चा झालेली आहे. महाराष्ट्राने देशात पहिलं महिला धोरण जाहीर केलं होते. सरकारी, निमसरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण महिलांना देण्यात आलं. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं.”
”मी मुख्यमंत्री असताना हे निर्णय घेतले. तरीही पंतप्रधान म्हणतात, या देशात महिला आरक्षणासंदर्भात यापूर्वी विचारही केला गेला नाही. माझ्याकडे संरक्षण खातं होतं तेव्हा पहिल्यांदा ११ टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता.” त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी चुकीचं बोलू नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page