![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/03/1000376250.jpg)
नवी दिल्ली- भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार होत असताना मी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री श्री.संजय धोंत्रे तसेच तत्कालीन खासदार श्री. विनय सहस्रबुद्धे व श्री. सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून दूरसंचार मंत्रालयाशी पत्रव्यवहार व नियमित पाठपुरावा करून नवीन 4G मोबाईल टॉवर्स मंजूर करून घेतले.
विद्यमान खासदारांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघात एकही उल्लेखनीय विकासकामं केलेलं नाही, केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना मतदारसंघात प्रभावीपणे राबाविल्या नाहीत. मागील पाच वर्षात खासदार महोदयानी बीएसएनएलच्या जिल्हा समितीच्या बैठकीला वेळ न दिल्याने एकही बैठक होऊ शकलेली नाही. मोबाईल टॉवरसाठी शासकीय भूसंपादन व सीमांकन प्रक्रियेला विलंब होत असल्याचे निदर्शनास येताच मी स्वतः मा. जिल्हाधिकारी व जिल्हा भूमीअभिलेख अधिकारी स्तरावर बैठक व चर्चा करून सदर प्रकिया सुलभ आणि जलद करून घेतली सदर कामकाजात मात्र खासदार महोदयांचा कुठेही सहभाग नव्हता. परंतु आता मात्र निवडणूक नजरेसमोर ठेऊन मोबाईल टॉवर भूमिपूजन करून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. आदरणीय कै. मधू दंडवते व मा. श्री. सुरेश प्रभू यांचा वारसा लाभलेल्या या मतदारसंघाला असे खासदार मिळणे मतदार संघाचे सर्वात मोठं दुर्दैव आहे. या राजकीय स्टंटबाजीला आगामी लोकसभा निवडणूकित जनता निश्चित उत्तर देईल यात शंका नाही.
मे. पेस डिजिटेक इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीला नवीन 4G मोबाईल टॉवर्स उभारण्याचे कंत्राट मिळाले आहे. सदर कंपनीच्या माध्यमातून कामाला दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी खासदार महोदय मागील आठवड्यात बीएसएनएलच्या महाराष्ट्र विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटले आणि सोशीयल मीडियात चमकले. परंतु सदर कंपनीला केंद्रीय स्तरावरुन काम मिळाले असल्याने त्याच स्तरावर चर्चा होऊ शकते एवढंसुद्धा खासदारांना माहिती असू नये हे हास्यास्पद आहे.
नवीन 4G मोबाईल टॉवर उभारणीत विलंब होत असल्याविषयी मी बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रवीण कुमार पुरवार यांच्याशी नवी दिल्ली येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयात चर्चा करून सविस्तर निवेदन दिले. कोंकणातील भौगोलिक स्थिती व मोबाईल नेटवर्क कव्हरेजची संपूर्ण परिस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यांनी त्वरित रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील रखडलेले काम शीघ्र गतीने चालू करण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत. कोंकणात रस्ते व महामार्गाची कामं चालू असल्याने बऱ्याच वेळा फायबर तुटत असते, त्यामुळे मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा विस्कळीत होतं असते. त्यासाठी मी रेल्वे राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून कोंकण रेल्वे मार्गातील रेलटेलच्या फायबरमधून खेड ते चिपळूण व रत्नागिरी येथे अतिरिक्त बँडवीडथ उपलब्ध करून घेतली आहे. आता लवकरच बीएसएनएलची स्वतःची फायबर कोंकणरेल्वे मार्गावरून जोडली जाणार असून त्यातून अखंडित पुरेशी बँडविडथ मिळणार आहे आणि त्यासाठी बीएसएनएलने त्यांचा आर्थिक सहभाग कोंकण रेल्वेला सुपूर्द केला आहे. त्यामुळे संपूर्ण कोंकणात मोबाईल नेटवर्क व इंटरनेटची स्थिर सेवा मिळणार असून कोंकणवासियाना दैनंदिन जीवनात त्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे.