मुंबई-गोवा महामार्गवर वृक्ष लागवडीबाबत आमदार शेखर निकम यांची मागणी; शासनाचा सकारात्मक प्रतिसाद…

Spread the love

चिपळूण- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवडीच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. महामार्गाच्या कामाला सुमारे १४ वर्षांचा कालावधी उलटूनही अनेक ठिकाणी वृक्षलागवड झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देत, वृक्षलागवडीसोबतच त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही संबंधित कंत्राटदारांवर निश्चित करण्यात येणार का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात अनेक ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमी स्वयंस्फूर्तीने वृक्षलागवड करत आहेत. कोकणातील अनेक नर्सरींमध्ये दोन ते तीन वर्षांची, दर्जेदार आणि चांगल्या वाढीची रोपे उपलब्ध आहेत. त्यामुळे महामार्गाच्या वृक्षलागवडीसाठी स्थानिक नर्सरींना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही आमदार निकम यांनी सभागृहात केली. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी सांगितले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या संबंधित कंत्राटदारांना वृक्षलागवडीबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी ट्री-गार्ड व इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत सूचना करण्यात येतील.

तसेच वृक्षलागवडीसाठी कोणत्याही एका विशिष्ट नर्सरीची सक्ती केली जाणार नाही. कोकणातील स्थानिक नर्सरींसह मलकापूर येथील कृषी विद्यापीठाची नर्सरी तसेच राज्यातील इतर उपलब्ध नर्सरींमधूनही आवश्यकतेनुसार रोपे उपलब्ध करून दिली जातील, असे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी सांगितले. आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे मुंबई-गोवा महामार्ग वृक्ष लागवड प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक नर्सरींना संधी, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीचे दीर्घकालीन संगोपन या तिन्ही बाबींना चालना देण्याच्या दृष्टीने शासनाने व्यक्त केलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page