![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/04/1000435769.jpg)
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांच्यात रस्सीखेच होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठं वक्तव्य केलय.
मुंबई : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारात सत्ताधारी-विरोधक ऐकमेकांवर चिखल फेक करत आहेत. महाविकास आघाडीमधून जागा वाटपाचं ठरलं असताना, दुसरीकडं महायुतीत अजून काही जागांवर एकमत होत नाही. तसंच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि मंत्री उदय सामंत (Kiran Samant) यांचे बंधू किरण सामंत दोघेही इच्छुक असल्यामुळं अजून या जागेचा तिढा महायुतीतून सुटला नसल्यामुळं अंतिम निर्णय होत नसताना, आता या जागेवरून मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
🔹️सामंतांना उमेदवारी मिळाली तर… :
सध्या महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेचा तिढा अद्याप कायम आहे. या जागेवरून उमेदवारी कोणाला मिळणार असा प्रश्न केसरकर यांना विचारला असता, किरण सामंत हे तरुण, तडफदार नेते आहेत. त्यांना जर या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर ते खूप जोमानं काम करतील. परंतु त्यांना ती जागा मिळेल की नाही हे मी आत्ताच सांगू शकत नाही. तसंच किरण सामंत यांना मोठं भवितव्य आहे. जर त्यांना तिकीट मिळालं तर राजकीय जीवनातील त्यांची ही पहिलीच निवडणूक असेल. जरी त्यांना तिकीट मिळालं नाही तरी सुद्धा ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं प्रचार करतील. तसंच कोकणात विधानसभा निवडणुकीसाठी अनेक मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघातून आमच्या वाटेला जो मतदारसंघ येईल त्यातून ते मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. एक तरुण नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहातो असं दीपक केसरकर म्हणाले.
🔹️आमचं ठरलं :
दुसरीकडं “रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवरून जर पक्षानं मला उमेदवारी दिली तर नक्कीच मला निवडणूक लढवण्यास आवडेल आणि मी मोठ्या मतांनी विजयी होईन,” असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय. मागील आठवड्यात नारायण राणे समर्थकांनी मोठमोठे बॅनर लावत “आमचं ठरलं… आमचा खासदार नारायण राणे”… असा मजकूर बॅनरवर लिहून त्यांनी प्रचार केला होता. तर दुसरीकडं उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या जागेवरुन निवडणूक लढविण्यास आग्रही आहेत.
🔹️लढत चुरशीची होणार :
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेना (ठाकरे गटाचे) विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलीय. कोकण हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत मोठ्या मताधिक्यानं निवडून आले होते. आता विनायक राऊतांच्या विरोधात जर नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली तर येथील लढत अत्यंत चुरशीची होईल, असं बोललं जातय. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना व्हावा, अशी आमची इच्छा आहे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.