दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांचा महामेळावा… १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना लाभ, जिल्हा प्रशासनाकडून समाधान आणि आनंद देणारा कार्यक्रम – न्यायमूर्ती माधव जामदार…

Spread the love

रत्नागिरी : दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिल्याची पुस्तिका जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी न्यायमूर्ती श्री. जामदार यांना सुपूर्द केली. इतक्या मोठ्या संख्येने जिल्हा प्रशासनाने जनतेला लाभ दिल्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांना लाभ दिल्याने समाधान आणि आनंद देणारा आजचा कार्यक्रम असल्याचे न्यायमूर्ती श्री.जामदार यांनी सांगितले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात विधी सेवा महाशिबीराचे फीत कापून न्यायमूर्ती श्री. जामदार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश सुनिल गोसावी, जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश निखिल गोसावी, तालुका वकील संघाचे अध्यक्ष वकील विजयसिंह पवार, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पहाणी करुन सविस्तर माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. यानंतर झालेल्या प्रमुख कार्यक्रमात ते म्हणाले, न्याय व्यवस्था आणि प्रशासन यांनी प्रगती केलेल्या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती हे पद मिळाले. हा जिल्हा विचारवंतांचा, बुध्दिवंतांचा, त्याग करणाऱ्यांचा आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे, ही न्यायाची व्यापक संकल्पना आहे. भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत, ते सर्वच नागरिकांना मिळाले पाहिजेत. सामाजिक न्याय तत्वांचा अंगीकार केलेला आहे. संविधानात अपेक्षीत असणारा न्याय राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समान संधी मिळण्याचा असा सर्वसमावेशक आहे. नागरिकांना जगण्याचा अधिकार आहेच, पण घटनेने तो अधोरेखित केलेला आहे. जीवन प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे.

सर्वसामान्य जनतेपर्यंत समाजातल्या तळागाळापर्यंत नागरिकाला लाभ पोहचवायचा असेल तर, कल्याणकारी योजना आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, त्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठीच विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या या कार्यक्रमाला लाभार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद, त्यांना देण्यात आलेला लाभ हे पाहून समाधान आणि आनंद देणारा आजचा कार्यक्रम आहे, असे सांगून त्यांनी सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गोसावी म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेऊन शहरात दीडशे तर, जिल्ह्यात तीनशे पन्नास कार्यक्रम घेतले. नागरिकांची जनजागृती करणे, नागरिकांना विविध विषयातील हक्क, गुन्ह्यांबाबत शिक्षेची माहिती देणे, न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या कमी करणे हा हेतू या कार्यक्रमामागील होता. लाभार्थ्यांनी, नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, या महाशिबीराची युध्दपातळीवर तयारी केली. विविध ४४ विभागांमार्फत ३१ स्टॉल उभारुन १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना लाभ दिला जातोय. यापुढेही लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ४ लाख १३ हजार महिलांना लाभ देत आहोत. शासन आपल्या दारी हा उद्देश प्रशासनामार्फत पूर्ण करतोय. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवर्जून आवाहन त्यांनी केले.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री. निखिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी न्यायमूर्ती श्री. जामदार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तालुका वकील संघाचे अध्यक्ष वकील श्री. पवार यांनी आभार प्रदर्शन केले. वकील सचिन गद्रे यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमाची सुरुवात वडाच्या झाडाला पाणी घालून तर सांगता राष्ट्रगीतांनी झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page