ठाणे : निलेश घाग शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या प्रकाराला आळा बसावा यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून वाहनतळांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील नेहरू नगर येथील भुखंडावर ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला असून त्याचे भुमीपुजन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्याने वाहनतळ इमारत उभारणीच्या कामाला सुरूवात होणार आहे. येत्या दिड वर्षात हे काम पुर्ण केले जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरातील रस्ते अपुरे पडू लागल्याने कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी Thane महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून रस्ते रुंदीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. रस्ते रुंद होत असले तरी शहरात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ही समस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने स्थानक परिसर तसेच शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणी वाहनतळ उभारणीची कामे हाती घेतली असून त्यापैकी काही वाहनतळांची कामे पुर्ण होऊन ती नागरिकांसाठी खुली झाली आहेत. त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील भुखंडावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बहुमजली वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला आहे.
जाहिरात
जाहिरात