देवरूखात चोरट्यांचा धुमाकूळ; तीन बंद घरे फोडली; शहरात उडाली खळबळ,देवरूख पोलीसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान…

Spread the love

देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तब्बल तीन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर या तीन घरफोडीच्या घटनांनी देवरूख पोलीसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान असणार आहे.

​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देवरूख शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या परिसरातील तीन घरे गेल्या काही दिवसांपासून बंद होती. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी या घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरभर सामान अस्ताव्यस्त टाकत चोरांनी मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीसांकडून या तिन्ही घरांचे रीतसर पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने, या तीनही घरांमधून एकूण किती रुपयांचा मुद्देमाल, सोने-चांदी आणि रोकड लंपास झाली आहे, याचा अचूक आकडा अद्याप समोर आलेला नाही.

मात्र, चोरीचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गजबजलेल्या भागात चोरी झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.​नेहमी लोकांची ये-जा असणाऱ्या आणि गजबजलेल्या ठिकाणी चोरांनी पोलीसांना थेट आव्हान देत धाडसाने या चोऱ्या केल्या आहेत. काही महिन्यांपुर्वी साडवली येथे अशाच प्रकारे चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. यावेळी एका रात्रीत अनेक घरे फोडून चोरट्यांनी सोन्याच्या ऐवजावर डल्ला मारला होता. तर काही रोख रक्कमदेखील लंपास केली होती. मात्र या चोऱ्यांचा छडा लागला नव्हता. तेव्हा एका रात्रीत बंद घरे फोडून एकप्रकारे पोलीस यंत्रणेला थेट आव्हान दिले होते. या चोरीच्या घटनेतील चोरट्यांना पकडण्यात देवरूख पोलीसांना अपयश आले होते. या चोरीच्या घटनेने संपूर्ण संगमेश्वर तालुका हादरून गेला होता. कारण एका रात्रीत अनेक बंद घरे फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला होता. आणि थेट पोलीसांनाच आव्हान दिले होते.

या चोरीच्या घटनेनंतर देवरूख पोलीसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी विविध पथके तयार केली होती. ही पथके चोरट्यांचा शोध घेत होती. मात्र आजपर्यंत या घटनेचा छडा लावण्यात पोलीसांना यश आलेले नाही. याचवेळी साखरप्यातही अज्ञात चोरट्यांनी बंद बंगला फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या चोरीचाही छडा आजपर्यंत लागलेला नाही. आता पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा देवरूख शहरात वळवल्याचे चित्र दिसून आले आहे. बरेच दिवस शांत असणारे वातावरण चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. देवरूख शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या तीन घरांना चोरट्यांनी लक्ष करत ती फोडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तर देवरूख पोलीसांसमोर या चोरीचा छडा लावण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. देवरूख पोलीस या चोरीच्या घटनेचा तपास वेगाने करत आहेत. मात्र चोरट्यांनी मागे कोणताही पुरावा ठेवला नसल्याने चोरट्यांना पकडणे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page