
*चिपळूण:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत येथे मंगळवारी मध्यरात्री एका भीषण रस्ते अपघातात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अज्ञात मरून रंगाच्या कंटेनर चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून उभ्या रिक्षाला आणि त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर चालक आपला कंटेनर घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जून रोजी मध्यरात्री १२:२८ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई-गोवा महामार्गावरील खेरशेत येथील ‘न्यू वृंदावन हॉटेल’ समोर ही घटना घडली. आरवली (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी असलेला आर्यन सुदेश पवार (वय २१) हा रस्त्याच्या कडेला असलेल्या आपल्या रिक्षाजवळ (एम.एच.०८ एल ९६३८) उभा होता.

याचवेळी मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात मरून रंगाच्या आयशर कंटेनर चालकाने वाहनावरील ताबा सुटल्याने आणि हलगर्जीपणामुळे प्रथम उभ्या असलेल्या रिक्षाला आणि त्यानंतर तिथे उभ्या असलेल्या आर्यनला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आर्यन पवार याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर तेजस रामचंद्र शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण (सावर्डे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात कंटेनर चालकावर भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४ (अ) (ब) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातानंतर जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पळून जाणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे या कलमांमुळे आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*