भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ; ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना गती: आमदार  प्रमोद जठार..

Spread the love

*रत्नागिरी* : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी ‘सेवा अभियान’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भाजपा संपर्क कार्यालय येथे या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांच्या विविध प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून महत्त्वपूर्ण पुढाकार घेण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांनी रत्नागिरी येथे उपस्थित राहून नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विविध शासकीय कामांसंदर्भातील निवेदने स्वीकारली. नागरिकांनी मांडलेल्या समस्या, प्रलंबित प्रकरणे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये अडकलेल्या कामांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी विधानपरीषद आमदार प्रमोद जठार यांनी देखील उपस्थित राहून नागरीकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

ज्या प्रकरणांमध्ये तातडीने प्रशासकीय हस्तक्षेप आवश्यक आहे, अशा विषयांबाबत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नियमांच्या चौकटीत आवश्यक ती कार्यवाही करून कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचना करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या योग्य पातळीवर मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

विशेष म्हणजे, केवळ स्थानिक पातळीवरील प्रश्नांपुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता शासनस्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या प्रकरणांसाठीही प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार आहे. अशा निवेदनांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे कव्हरिंग लेटर जोडून संबंधित मंत्री कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय तसेच आवश्यक त्या शासकीय विभागांकडे प्रस्ताव व निवेदने पाठविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यामुळे नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य प्रशासकीय तसेच शासनस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे.

भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित संघटना नसून, सामान्य माणसाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे, हा संदेश ‘सेवा अभियान’च्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय यंत्रणेकडे पोहोचवून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करण्याची ही कार्यपद्धती निश्चितच कौतुकास्पद आहे.

‘सेवा अभियान’च्या माध्यमातून भाजपा संघटनेला प्रशासकीय बळ मिळत असून, नागरिकांच्या प्रश्नांना केवळ आश्वासन न देता त्यासाठी प्रत्यक्ष प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची नवी कार्यसंस्कृती निर्माण होत आहे.

सातारा येथे पार पडलेला हा उपक्रम नागरिक, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणारा आहे. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी थेट मार्गदर्शन व पाठपुरावा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी  भाजपा रत्नागिरी दक्षिण चे महामंत्री ओंकार फडके, स्वानंद रानडे, शहर अध्यक्ष दादा ढेकणे, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, बावा नाचणकर, मंडल अध्यक्ष दादा दळी, प्रतिक देसाई तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page