
गुहागर : तालुक्यातील कुटगिरी येथे भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव कोसळून आठ जनावरे अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करत सर्व जनावरांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाने अवघ्या १८ तासांच्या आत ३२ हजार रुपयांची शासकीय आर्थिक मदत दिली.
कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव सोमवारी (ता. ३) सायंकाळी अचानक कोसळला. त्यावेळी साकवावरून जाणारी आठ जनावरे त्यामध्ये अडकली. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे सर्व आठ जनावरांना बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेत दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला, तर उर्वरित जनावरे किरकोळ जखमी झाली. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी आवश्यक कार्यवाही करत जखमी जनावरांवर उपचार केले. तसेच मृत बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले.
बैलाच्या मृत्यूमुळे नुकसान झालेल्या शेतकरी दिलीप लिंगायत यांना प्रशासनाकडून ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेअकरा वाजता उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश लिंगायत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या वेळी गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील, पाटपन्हाळे मंडळ अधिकारी अनिल राठोड तसेच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. जखमी जनावरांवर आवश्यक उपचार सुरू ठेवण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी लिगाडे यांनी पशुवैद्यकीय विभागाला दिल्या आहेत.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर