आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक झाले विद्यार्थी,घारपी शाळेतील गुरुपौर्णिमा ठरली संस्कारांचा अविस्मरणीय उत्सव…

Spread the love

संजय भाईप/ सावंतवाडी:- “मातृदेवो भव, पितृदेवो भव” या भारतीय संस्कृतीच्या महान संदेशाचा जिवंत प्रत्यय देणारा भावस्पर्शी गुरुपौर्णिमा सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे भक्तिमय आणि संस्कारमय वातावरणात साजरा करण्यात आला. “आई-वडील हेच जीवनातील पहिले गुरु” या उदात्त विचाराची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, तसेच ज्ञानदान करणाऱ्या गुरूजनांप्रती आदराची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने माता-पालकांचे पाद्यपूजन व शिक्षक गुरूजनांचे पूजन हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि गुरु वंदनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे औक्षण करून अत्यंत आदराने त्यांच्या चरणांचे पाद्यपूजन केले. तसेच शाळेतील गुरूजन शिक्षकांचे पूजन करून त्यांच्याप्रती श्रद्धा, आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रेमाने आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला, तर शिक्षकांच्या चरणी वंदन करून ज्ञानाच्या मंदिरातील गुरूंचे महत्त्व अधोरेखित केले. प्रेम, संस्कार, कृतज्ञता आणि माणुसकीचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन, भक्तिगीते, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षकांनी गुरुपरंपरेचे महत्त्व, आई-वडिलांचे ऋण आणि जीवनात संस्कारांचे स्थान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि जीवनाची दिशा देणारे मार्गदर्शक असतात; तर आई-वडील हे जीवनातील पहिले गुरु असतात. या दोन्ही गुरूंच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञताच गुरुपौर्णिमेची खरी पूजा आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, पोलिस पाटील समृद्धी गावडे,सहदेव गावडे,बाबू गावडे, वासुदेव नाईक, जानकी गावडे आदि पालक आणि ग्रामस्थ यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा संस्कारमय सोहळा अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय ठरला.घारपी शाळेतील गुरुपौर्णिमेचा हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर प्रेम, आदर, कृतज्ञता आणि संस्कारांचा उत्सव होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आई-वडिलांसह गुरूजनांच्या चरणी वंदन करून भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा सुंदर आदर्श घालून दिला. हा भावस्पर्शी सोहळा उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page