
नवी दिल्ली : इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी देशातील विविध वाहतूक संघटनांनी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर निषेध मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनसह अनेक वाहतूक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी सांगितले की, देशभरातून E20 इंधनामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. या प्रश्नाकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार असून, हा कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाचा ‘E-20 जनता पार्टी’, ‘कॉकरोच जनता पार्टी (CJP)’ किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा संघटनेशी संबंध नसल्याचेही सम्राट यांनी स्पष्ट केले. आंदोलनाचा उद्देश केवळ वाहनधारक आणि वाहतूक क्षेत्राच्या समस्या सरकारसमोर मांडणे हा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिश सभावाल यांनीही या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. सरकारने E20 हे एकमेव पेट्रोल म्हणून उपलब्ध करून देण्याऐवजी वाहनधारकांना इतर इंधनांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, त्यांच्या संघटनेने सध्या कोणत्याही संपाची हाक दिलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या E20 इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल असते. वाहनधारकांकडून या इंधनामुळे मायलेज कमी होणे, इंजिनवर परिणाम होणे आणि इतर तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे, केंद्र सरकारने या धोरणाचे समर्थन करत E20 इंधन सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा दावा केला आहे. तसेच इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*