अर्ध्या तासाचा प्रवास आता तासभराचा…संगमेश्वर–देवरुख मार्ग पुन्हा खड्डेमय; वाहनचालक त्रस्त, अपघाताचा धोका वाढला..

Spread the love

संगमेश्वर : संगमेश्वर –देवरुख – साखरपा या राज्य मार्गावरील संगमेश्वर ते देवरुख दरम्यानचा रस्ता पुन्हा एकदा मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अवघ्या अर्ध्या तासाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी आता तब्बल एक तास लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमेश्वर ते बुरंबी या पट्ट्यातील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे ही दुरुस्ती अल्पावधीतच उखडून गेली. कार्पेटवरील खडी निघाल्याने रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे.

अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून चारचाकी वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात केवळ तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी आणि गुणवत्तापूर्ण उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही नागरिकांनी अधोरेखित केले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page