निकृष्ट भूमिगत केबल कामाविरोधात  महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा…

Spread the love

*रत्नागिरी  :*  वीज वितरण कंपनी आणि एका खासगी ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून मिऱ्या भागात करण्यात आलेले भूमिगत केबल व स्ट्रीट लाईटचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत रत्नागिरीतील मिऱ्या येथील शेकडो नागरिकांनी सोमवारी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला .  ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
    

महावितरण आणि खासगी कंपनीने लाखो रुपये खर्चुन भूमिगत केबल टाकणे आणि स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम केले आहे. मात्र, हे काम करताना अंदाजपत्रकातील सुरक्षेचे सर्व नियम पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
     

‘हाय टेन्शन’ आणि ‘लो टेन्शन’ वाहिन्यांसाठी जमिनीखाली योग्य खोलीवर केबल टाकणे आवश्यक असताना, अतिशय वरवर केबल टाकण्यात आल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे, फिडर आणि डीपीच्या ठिकाणी मुख्य विद्युत वाहिन्या उघड्यावर पडल्या आहेत. केबलसाठी बसवण्यात आलेले लोखंडी बॉक्स अवघ्या काही दिवसांत सडून गेले असून ते उघडेच आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांना व गुरांना वारंवार शॉक लागण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत मिऱ्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महावितरणकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, अधिकारी आणि ठेकेदार कंपनीने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला.
    

सोमवारी सकाळी मिऱ्या येथील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने महिला घोषणाबाजी करत महावितरणच्या कार्यालयावर धडकल्या. कार्यालयात पोहोचताच संतप्त महिलांनी मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला आणि जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर येऊन चर्चा करत नाहीत, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेतला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page