व्यक्तीनिष्ठा सोडून तत्त्वनिष्ठा व सिद्धांतनिष्ठेकडे वळा; राष्ट्र प्रथम हीच भावना ठेवा,मंत्री आशिष शेलार यांचा चिपळूणातील मेळाव्यात कार्यकर्त्यांना सल्ला…

Spread the love

चिपळूण- भारतीय जनता पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागतच आहे. “नव्या सुनेचे कौतुक व्हायलाच हवे. सुना म्हणून आपण एकत्र राहू, कुटुंब म्हणून एकत्र राहू. पक्षात जुना-नवा असा कोणताही वाद असता कामा नये,” असे सांगत व्यक्तीनिष्ठेपेक्षा तत्त्वनिष्ठा आणि पुढे सिद्धांतनिष्ठेकडे वाटचाल करण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

चिपळूण येथील सहकार भवन येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, ॲड. दीपक पटवर्धन, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व सतीश मोरे, सहदेव बेटकर, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, सीमा चव्हाण, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सुशांत शेलार, निलेश सुर्वे, नगराध्यक्षा रूपाली दांडेकर, शशिकांत मोदी, शुभम पिसे, संदीप भिसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना शेलार म्हणाले की, व्यक्तीपुरती निष्ठा मर्यादित असावी. संघटनेचे कार्य जेव्हा व्यक्तीनिष्ठेकडे झुकते, तेव्हा त्या संस्था किंवा संघटनेची ‘एक्सपायरी’ जवळ आली असे समजावे. व्यक्तीनिष्ठेला बळी पडणाऱ्या संस्था हळूहळू मृतप्राय होतात. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने व्यक्तीनिष्ठा सोडून तत्त्वनिष्ठेकडे आणि तत्त्वनिष्ठेतून सिद्धांतनिष्ठेकडे वाटचाल करावी. देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च आणि त्यानंतर मी ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असावी. समाजातील सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याची कार्यपद्धती विकसित झाली पाहिजे. राष्ट्राची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे आणि वाढलेली ताकद पुन्हा जनतेच्या सेवेसाठी अर्पण करावी, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

यावेळी शेलार यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या गेल्या बारा वर्षांतील विविध विकासकामांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना आगामी संघटनात्मक कामासाठी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद सातत्याने वाढत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक अशा विविध स्तरांवर पक्षाचे प्रतिनिधित्व वाढल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनीही मनोगत व्यक्त करत संघटनात्मक बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

आमदार प्रमोद जठार यांनी आपल्या भाषणात आशिष शेलार हे कोकणचे सुपुत्र असल्याचे सांगत, सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून ते दशावतारासह कोकणातील लोककला आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी भरीव योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला. ॲड. दीपक पटवर्धन यांनी शेलार यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत, भाजप सामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी देणारा पक्ष असल्याचे सांगितले. मागील कोकण दौऱ्यात शेलार यांनी रत्नागिरीतील एका उद्योगाला भेट दिली होती, तर यावेळी वाशिष्टी डेअरी दुग्ध प्रकल्पाला भेट देऊन स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा आदर्श त्यांनी घालून दिल्याचे पटवर्धन यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले. कार्यकर्ता मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागांतून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नव्याने पक्षात प्रवेश केलेले सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page