कल्याण, डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना शनिवारी जोरदार पावसामुळे सुट्टी…

Spread the love

कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी या सुट्टीसंदर्भात शुक्रवारी संध्याकाळी एक पत्रक प्रसिध्द केले आहे.

कल्याण – मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पूरपरिस्थितीचा विचार करून कल्याण डोंबिवली पालिकेच्या शिक्षण विभागाने आपल्या पालिका हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालयांना शनिवारी (ता. ४) सुट्टी जाहीर केली आहे.

कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी भारत बोरनारे यांनी या सुट्टीसंदर्भात शुक्रवारी संध्याकाळी एक पत्रक प्रसिध्द केले आहे. कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, सी. बी. एस. ई., आय. सी. एस. ई., सी. आय. ई. या व्यवस्थापनांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना हा सुट्टीचा निर्णय लागू असणार आहे.

शासनाने प्राप्त परिस्थितीप्रमाणे स्थानिक प्रशासन यंत्रणांनी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी ४ जुलै रोजी रेड ॲलर्ट, ५ जुलै रोजी यलो ॲलर्ट असे जोरदार, अति मुसळधार पावसाचे इशारे दिले आहेत.

या कालावधीत शाळा, महाविद्यालय सुरू राहिल्या तर मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. रस्ते जलमय होऊन शालेय बस वाहतुकीवर परिणाम झाला तर विद्यार्थी, शिक्षकांना शाळेत, वाहतूक कोंडीमुळे अर्ध्या रस्त्यात अडकून पडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाने शनिवारी (ता. ४) अतिमुसळधार पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती विचारात घेऊन ही सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविद्यालय, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी यापुढील कालावधीतही मुसळधार पाऊस असेल तर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होणार नाही, याबाबत योग्य त्या उपाययोजना करावयाच्या आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवली शहरांची दैना उडवली आहे. शहराच्या विविध भागातील वस्तींत पाणी घुसले आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावर पाणी तुंबल्याने त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत या रस्त्यालगत असलेल्या शाळांमधील विद्यार्थी शालेय बसमध्ये एक ते दीड तास अडकून पडले. शहराच्या अंतर्गत भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

शालेय बसना वळसा घेऊन जावे लागले होते. यामुळे पालकांची बसमधून येणाऱ्या मुलांना घेताना त्रेधातिरपिट उडाली होती. अनेक शाळा कल्याण शहराच्या वेशीवरील म्हारळ, कांबा भागात आहेत .या भागातील महामार्ग, अंतर्गत रस्ते सखल भागात आहेत. या रस्त्यांवर नेहमीच पाणी तुंबते. उल्हास नदीला पूर आला की हे पाणी म्हारळ परिसरातील सखल भागात घुसून या भागात पूरपरिस्थिती होते. शाळांचा परिसर जलमय होतो. या सर्व परिस्थितीचा विचार करून पालिका प्रशासनाने शनिवारी अतिजोरदार पावसाचा विचार करून सुट्टी जाहीर केली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page